पावसाने फिरवली पाठ
समीर भुजबळ
वाल्हे – दरवर्षी जून महिन्यांच्या पहिल्याच आठवड्यात पेरणी होती. मात्र, यावर्षी जुलै आर्धा संपला तरीही रिमझीम पाऊस सोडून मोठा पाऊस पडला नसल्याने अनेकांनी खरीप हंगामातील पिकांकडे विषेशत: बाजरीच्या पेरणीकडे पाठ फिरविली आहे. यावर्षी वाल्हे व परिसरात पाऊस कमी प्रमाणात पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून बाजरीचा पेरा कमी झाल्याने शेतकऱ्यांचे पूर्ण आर्थिक गणितच बिघडलेले आहे.
यावर्षी मान्सूनपूर्व पाऊस वाल्हे परिसरात पडला नसल्याने, तसेच मान्सून पाऊस जुलै महिन्यात रिमझीम पाऊस पडल्याने, भविष्यात वाल्हे परिसरातील शेतकरीवर्गाला पाण्याची टंचाई जाणवणार असल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त होत असून पाऊस पडला नसल्याने परिणामी खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या मागील वर्षीच्या तुलनेत अत्यंत कमी प्रमाणात झाल्याने, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
मागील दोन वर्षांपूर्वी वाल्हे परिसरामध्ये 1124 हेक्टर, मगील वर्षी 677 हेक्टर तर यंदा 2 ऑगस्टपर्यंत 460 हेक्टर क्षेत्रात बाजरीची पेरणी झाली आहे, अशी माहिती कृषी सहायक गीता पवार यांनी दिली. दरम्यान, अनेक शेतकरी दमदार पावसाच्या प्रतिक्षेत होते; मात्र यावर्षी मान्सून पूर्व पाऊस वाल्हे परिसरामध्ये पडलाच नाही. त्यामुळे अनेक शेतकरी उसाची लागवड करावी की बाजरी उत्पन्न घ्यावे, या द्विधा मनःस्थितीत आहेत. अजूनही दमदार पाऊस झाला नसल्याने व पुढे होईल की नाही याचा भरोसा नसल्याने थोड्या पाण्यावर बाजरीचे पीक येऊ शकते. या आशेवर बाजरीची पेरणी केली आहे.
मागील चार वर्षांतील पाऊस
6 ऑगस्ट 2020 पर्यंत 299 मिलीमीटर पाऊस पडला होता. तसेच त्या वर्षभरात अंचाकी 826 मिलीमीटर पाऊस पडला होता. मागील वर्षी आजअखेर 2 ऑगस्ट 2021 पर्यंत 235 मिलिमीटर पाऊस पडला होता. तर संपूर्ण वर्षभरात 399 मिली मिटर पाऊस पडला होता. मागील वर्षी 2 ऑगस्ट 2022 अखेर फक्त 147 मिलीमीटर पाऊस पडला होता. यावर्षी 2 ऑगस्टपर्यंत फक्त 42 मिलीमीटर पाऊस पडला आहे, अशी माहिती वाल्हे महसूल विभागाकडून तलाठी सतीश उमाप यांनी दिली.