वाल्हे – यावर्षी तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असतानाही जनावरांच्या हिरव्या चार्यांसाठी लागवड केलेल्या मका पिकांवर किडीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने आगोदरच तीव्र पाणीटंचाईने मेटाकुटीस आलेला शेतकरी मका पिकावरील किडीने चिंताग्रस्त होत आहे.
यावर्षी पुरंदर तालुक्यात तीव्र दुष्काळी परिस्थितीती निर्माण झाली असून दावणीची जनावरे जागविण्यासाठी शेतकरी धडपडत आहेत. अशातच, जनावरांना चारा उपलब्ध व्हावा यासाठी शेतात केलेली मका अतिअल्प पाण्यावर कशीतरी जगविण्यासाठी धडपडत असताना या पिकांवर होत असलेले विविध रोगांमुळे येथील शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
वातावरणातील बदलाचा विपरीत परिणाम शेतीवर आणि पर्यायाने पिकांवर होत आहे. वाल्हे व परिसरातील शेतकरी शेतीसह दुध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करतात. जनावरांना ओला चारा म्हणून, मका, कडवळ आदी चारा पिके करतात. मागील काही दिवसांपासून मका पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने मका पिक वाचवण्यासाठी अनेक शेतकरीवर्ग त्यासाठी औषध फवारणी करताना दिसत आहेत.
लष्करी आळी मका पिकांला झाल्यावर मक्याची पाने अळी खाऊन, मका पिकाच्या कोब्यामध्ये अळी राहिल्याने व ती चार्याच्यामधून जनावरांच्या पोटामधे गेल्यावर जनावरांचे पोट फुगून जनावरे दगवण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे येथील शेतकरी मका पिकांवर लष्करी अळीचा नाश करण्यासाठी औषध फवारणी करताना दिसत आहेत.