दौंडजमधील शेतकरी समाधानी
वाल्हे (वार्ताहर) – दौंडज (ता. पुरंदर) परिसरामध्ये या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने बाजरीचे पीक सध्या जोमात आले आहे. सध्या बाजरीची कणसे फुलोऱ्यात आली असल्यामुळे शेतकरी समाधानी आहे.
येथील, भुईमूग, तूर, कांदे, मटकी, मूग, चवळी, उडीद, सूर्यफूल आदी पिकांना सध्या पावसाची नितांत गरज आहे. बाजरीचे पीक हमखास येणार असल्याने एका बाजूला धान्याचा तर दुसऱ्या बाजूला जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
वाल्हे, दौंडज, हरणी, मांडकी, वागदरवाडी, बहिर्जिचीवाडी, मोरूजीचीवाडी, वडाचीवाडी, सुकलवाडी, पवारवाडी, कवडेवाडी, पिसुर्टी, मुकदमवाडी, गायकवाडवाडी, कामठवाडी आदी परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात बाजरीच पीक घेतात. त्यामुळे धान्याबरोबरच जनावरांचा चारा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो. एकंदरीतच यावर्षी बाजरीचे पीक चांगल्या प्रकारे हाती लागणार असल्याचे परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले. मध्यंतरी पावसाने दडी मारल्यामुळे पीक धोक्यात आले होते. त्यामुळे बाजरीला पाण्याची गरज निर्माण झाली होती. मात्र आता पावसाला पुन्हा सुरुवात झाल्याने बाजरीचे पीक तरारले आहे, असे दौंडज येथील शेतकरी रमेश घोगरे यांनी सांगितले.