सातारा – राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार फार काळ टिकणार नसून राज्यात लवकरच मध्यावधी निवडणुका लागतील, अशी शक्यता जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली. विविध मुद्यांवरुन हे सरकार लवकरच कोसळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
येथील राष्ट्रवादी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत आ. शिंदे बोलत होते. महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षात दर्जेदार कामे केली होती. राज्यात महाविकास आघाडी मजबूत होत असल्याचे पाहून भाजपने एकनाथ शिंदे यांना फोडून राज्यात सत्तांतर केले. मात्र, सरकार स्थापन झाल्यापासून भाजप व शिंदे गटात कुरापती सुरु आहेत. मुळात हे सरकार कधी कोसळेल हे सांगता येत नाही. न्यायालयात 16 आमदारांबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
मंत्रीमंडळ विस्तारावरुन अंतर्गत धुसफूस असून नव्याने मंत्रीमंडळ विस्तार झाला तरी सरकार अल्पमतात येण्याचा धोका आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक झाल्यानंतर भाजपच हे सरकार चालू देणार नाही. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असलेले आमदार जास्त काळ त्यांच्याबरोबर राहतील याची भाजपलाच खात्री नसल्याने विविध मुद्यांवरुन हे सरकार कोसळून राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील, असा विश्वास आ. शिंदे यांनी व्यक्त केला.
राज्यातील सरकार हे स्थगिती सरकार असून आम्ही कधीही सुडबुध्दीने कामे केली नाहीत. मात्र, या सरकारमधील आमदार आम्ही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या अशी वल्गना करत आहेत. भाजपने आपल्या फायद्यासाठी सुडभावनेने शिवसेना संपवण्याचे षडयंत्र सुरु केले असून शिवसेना हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष असल्याने आम्ही शिवसेनेची संगत या संकटात मुळीच सोडणार नाही. उध्दव ठाकरे यांना कोंडीत पकडण्याचा डाव असून आत्तापर्यंत केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या नेत्यांना चुकीच्या पध्दतीने टार्गेट करण्यात आल्याचा आरोप आ. शिंदे यांनी केला.
उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या गटात न्यायालयीन व निवडणूक आयोगाकडे लढाई सुरु आहे. मात्र, ज्याप्रमाणे निर्णय लागत आहेत त्यानुसार लोकशाहीला धोका निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. निवडणूक आयोगाला पक्षाचे चिन्ह गोठवण्याचा अधिकार आहे. मात्र, पक्षाचे नावही वापरायचा नाही हा निर्णय प्रथमदर्शनी चुकीचा वाटत असून दोन्हींबाबत स्थगितीबाबत आश्चर्य वाटत आहे. त्यामुळे जनतेचा लोकशाहीवरील विश्वास उडणार नाही असे काम अपेक्षित आहे. 2024 पर्यंत राज्यातील लोकशाही जाऊन हुकूमशाही येईल, अशी परिस्थिती असल्याने भाजपविरोधी पक्ष, संघटनांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे आ. शिंदे यांना सांगितले. यावेळी जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, शफिक शेख आदी उपस्थित होते.
एकदाच आमदार झालेले हवेत आहेत
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आम्हाला खूप काही दिले आहे. चार वेळा आमदार झालो. दोन वेळा मतदारसंघ बदलून आमदार झालो. पक्षाने मंत्रिपदही दिले. आमदारकी, मंत्रिपदाच्या माध्यमातून केलेल्या कामाची पोहोचपावती म्हणून आजही जनता आपल्या बरोबर आहे. मात्र, एक वेळ आमदार झालेले आज हवेत असून सरकार कोसळल्यानंतर ते हवेतून खाली येतील, असा टोल आ. शशिकांत शिंदे यांनी आ. महेश शिंदे यांना लगावला.