नागठाण – साखर कारखान्यांनी वजन काट्यात लबाडी करून शेतकऱ्यांचे कोट्यवधी रूपये लुटले आहेत. ही लूट थांबविण्यासाठी तेल कंपन्यासारखा ऑनलाइन वजनकाटा साखर कारखान्यांनी बसवावा यासाठी सरकारवर दबाव आणणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या आले पिकाची खरेदी करताना व्यापाऱ्यांनी कोणतीही वर्गवारी न करता प्रचलित पद्घतीनुसार सरसकट खरेदी करावी अन्यथा स्वाभिमानीशी गाठ असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने गळीतास गेलेल्या ऊसाची एकरकमी एफआरपी व आले पिकांची सरसकट खरेदी यासाठी जनजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री. शेट्टी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य बाळकृष्ण साळुंखे होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, जयकुमार कोल्हे, राज्य प्रवक्ते अनिल पवार, जिल्हाध्यक्ष राजू शेळके, देवानंद पाटील, राज्य कार्यकारणी सदस्य अर्जुनराव साळुंखे, ऍड. विजयराव चव्हाण, ऍड. सतीश कदम, कृषीभूषण मनोहर साळुंखे आदी उपस्थित होते.
श्री. शेट्टी म्हणाले, “”आम्ही कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात एफआरपीपेक्षा जास्त दर घेतो आणि सातारा जिल्ह्यात एफआरपी कपात केली जात असेल तर शेतकऱ्यांनी संघटीत होणे गरजेचे आहे. काटामारीतून तयार होत असलेल्या साखर चोरीमुळे 225 कोटीचा जीएसटी बुडवला जात असल्याचे संबधित विभागाला निदर्शनास आणून दिले आहे.
काटामारी शेतकऱ्यांच्या मुळावर आली असून ही रोखण्यासाठी पेट्रोलियम कंपन्याप्रमाणे ऑनलाइन प्रणालीचा वापर कारखानदारांनी करावा, यासाठी शासनावर स्वाभिमानी दबाब वाढविणार आहे.” आले खरेदी करताना व्यापारी नवे-जुने करत आहेत. ही पद्धत शेतकऱ्यांच्या नुकसानीची आहे. यासाठी सातारा, औरंगाबाद, जालना आदी ठिकाणी सभा घेऊन एकत्रित खरेदी करण्यास भाग पाडणार आहे. यातूनही काही व्यापारी वाकड्यात गेल्यास त्यांची गाठ स्वाभिमानीशी आहे, असा इशाराही त्यांनी दिला.