नवी दिल्ली – जम्मू काश्मीरमध्ये पीपल्स डेमोक्रॅटीक पार्टी अर्थात पीडिपीने भारतीय जनता पार्टीवर हल्लाबोल सुरू केला आहे. आपल्या पसंतीच्या लोकांना निवडणुकीत विजयी करण्यासाठी भाजपने काश्मीरमध्ये मतांची चोरी केली असल्याचा आरोप पीडिपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी केला आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सर्वसामान्य लोकांचा लोकशाहीवर असलेला विश्वास संपुष्टात आणण्याचे काम करत असल्यामुळे त्यांना प्रत्युत्तर द्यावे लागेल.
आपला पक्ष फोडण्यासाठी भाजपने ए, बी आणि सी टीम सक्रिय केल्या आहेत. जम्मू काश्मीरमधील मतांची चोरी करून येथील लोकांचे अधिकार हिरावून घेणे एवढाच त्या लोकांचा हेतू असल्याचे मेहबुबा यांनी आरोप करताना म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांत पीडिपीच्या अनेक नेत्यांनी पक्ष सोडला आहे. त्यात सय्यद अल्ताफ बुखारी यांच्यासह माजी मंत्री इम्रान रझा अन्सारी, बशारत बुखारी, अब्दुल रहिम राथर, माजी उपमुख्यमंत्री मुझफ्फर बेग, माजी मंत्री हसिब द्राबू, जावेद मुस्तफा मीर, अशरफ मीर आदी प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. एवढेच नाही तर पीडिपीच्या अध्यक्षा आणि माजी मुख्यमंत्री असलेल्या मेहबुबा मुफ्ती यांच्या अनेक नातलगांनीही पक्षाला रामराम ठोकला आहे.
जम्मू काश्मीरमध्ये फारूख अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स हा दुसरा प्रबळ पक्ष आहे. त्या पक्षाने विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत सहभाग घेतला असल्यामुळे आम्ही पीडिपीशी कोणतीही युती करणार नसल्याचे त्यांनी अगोदरच जाहीर करून टाकले आहे. काश्मीरमध्ये लोकसभेच्या पाच जागांसाठी पाच टप्प्यांत मतदान होणार आहे.