नवी दिल्ली – भारतीय संघात एकेकाळी आवर्जुन निवड होत असलेल्या मयंक आग्रवालच्या कारकिर्दीला आता धोका निर्माण झाला आहे, असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रख्यात समालोचक आकाश चोप्रा यांनी व्यक्त केले आहे. याबाबत अद्याप नियमित कर्णधार रोहित शर्मा तसेच नियमित मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आपले मत व्यक्त केले नसले तरीही संघ निवडीत सध्या मयंकच्या नावाचा विचारही केला जात नसल्याचे संकेत मिळाले आहेत.
इंग्लंडविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या एकमेव कसोटीसाठी त्याची संघात निवड करण्यात आली होती; परंतु शुभमन गिल व चेतेश्वर पुजारा यांनीच डावाची सुरुवात केली व त्यावेळी या सामन्यात मयंकला खेळवण्यात आले नव्हते.
त्यानंतर आता झिम्बाब्वे विरुद्धची मालिका तसेच आशिया करंडक स्पर्धेसाठीही त्याच्या नावाचा विचार झाला नाही, त्यामुळे आता त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दही वेळेपूर्वीच संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला आहे.