IND vs AUS 2023 – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुचर्चित आणि प्रतिष्ठेची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ९ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या चार सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या व्हीसीए स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यासाठी दोन्ही संघ नागपुरात पोहोचले असून आपापल्या तयारीत व्यस्त आहेत. मागील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात धूळ चारली होती. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियन संघ भारतात येऊन मागील पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करेल.
दरम्यान, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्याद्वारे त्यांनी भारतीय क्रिकेट संघाला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. ऑस्ट्रेलियाच्या या ट्विटला भारताकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. टीम इंडियाचा माजी सलामीवीर आणि समालोचक आकाश चोप्रा ऑस्ट्रेलियाला उत्तर देण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही. आकाश चोप्राने ऑस्ट्रेलियाच्या ट्विटला प्रत्युत्तर देताना एक ट्विट केले आहे.
क्रिकेट डॉट कॉम डॉट एयू ने आपल्या ट्विटर खात्यावर टीम इंडियाचा डाव ३६ धावांवर ऑलआऊट झाल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. ट्विटच्या कॅप्शनमध्ये आश्चर्यचकित झाल्यासारखा इमोजी वापरून “सर्वबाद 36 धावा, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेला गुरुवारपासून सुरुवात होत आहे.” असे लिहिले आहे. यावर आकाश चोप्राने ट्विट केले की, “आणि मालिकेची स्कोअर-लाइन?”
All out for 36 😳
The Border-Gavaskar Trophy starts on Thursday! #INDvAUS pic.twitter.com/Uv08jytTS7
— cricket.com.au (@cricketcomau) February 6, 2023
And the series score-line? #JustAsking 🫶 https://t.co/u0X43GgS8k
— Aakash Chopra (@cricketaakash) February 6, 2023
ऑस्ट्रेलियाकडून ट्विट करण्यात आलेला व्हिडिओ २०२०-२१ मध्ये अॅडलेडच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यातील भारताच्या दुसऱ्या डावाचा आहे. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम खेळताना पहिल्या डावात २४४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात १९१ धावांत गारद झाला आणि भारताकडे ५३ धावांची आघाडी होती. दुसऱ्या डावात कांगारू संघाच्या गोलंदाजांनी दमदार खेळ दाखवला आणि भारताचा दुसरा डाव अवघ्या ३६ धावांत गारद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने या सामन्यात भारताचा ८ विकेट्स राखून पराभव केला होता.
यानंतर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने शानदार पुनरागमन करत कांगारू संघाचा ८ गडी राखून पराभव केला आणि मालिकेतील तिसरा सामना अनिर्णित राहिला. त्यानंतर चौथ्या सामन्यात भारताने यजमान संघाचा ३ गडी राखून पराभव करत मालिका २-१ अशी जिंकली. आकाश चोप्राने आपल्या ट्विटमध्ये याच स्कोअर लाइनचा उल्लेख केला आहे.