अरुण गोखले
कुंभारासारखा गुरू नाही रे जगात,
वरी घालितो धपाटा, आत आधाराचा हात…
महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगुळकर यांच्या पदरचनेतल्या गुरूच्या कार्याची महानता आणि त्याची कुशलता सांगणाऱ्या या ओळी.
इथे त्यांनी गुरूंना कुंभाराची उपमा दिली आहे, ती खरोखरच सार्थ आहे. कारण आपल्या समोरच्या मातीच्या गोळ्यांना सुंदर आकार देताना खरोखरच त्यांच्या कौशल्याची कसोटी लागत असते.
मानवी जीवनात या गुरूंना एक आगळं वेगळं आणि वंदनीय असं स्थान आहे. आपल्या भारतीय संस्कृतीने सांगितलेल्या तीन वंदनामध्ये माता, पिता आणि गुरू यांना महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. गुरू हे तत्त्व आहे. त्या गुरू या पदावर जे पोहोचतात ते जगात गुरू आणि सद्गुरू या नावांनी ओळखले जातात. तुम्हा आम्हा प्रत्येकालाच आपल्या जीवनाला एक सुंदरसा आकार देण्यासाठी अशा गुरू आणि सद्गुरू ह्या दोघांचीही नितांत गरज असते.
प्रपंच्यात आपली या गुरूतत्त्वाशी पहिली ओळख होते ती मातेकडून मिळणाऱ्या दुधाबरोबरच्या शिकवणीपासून. माता ही आपल्या सर्वांचीच प्रथम गुरू आहे. बालकांच्या जीवनघडणीत मातेचे महत्त्व किती मोलाचे असते हे आपण अनेक थोर पुरुषांच्या जीवन चरित्रातून पाहिलेले आहेच.
मानवी जीवनातले दुसरे आदरणीय गुरूस्थान दिले आहे ते पित्यास. त्याचाही मुलांच्या जीवन घडविण्याच्या कामात महत्त्वाचा असा वाटा असतोच.
तिसरे ते शालेय गुरू. ते आपल्याला ज्ञानाची कवाडे उघडून देतात. शिक्षणाबरोबरच कला आणि कौशल्याच्या मदतीने तेच शिक्षण हे अर्थार्जनासाठी कसे वापरायचे हे शिकविणारेही व्यवसाय मार्गदर्शक असतात, ते सुद्धा गुरूच. वेळोवेळी आपल्याला अचूक मार्गदर्शन करीत आपल्याला यशाच्या शिखराकडे घेऊन जाण्याच्या कामी अशा अनेक गुरूजनांचा मोठा वाटा असतो. आपले लौकिक जीवन सार्थ करणारी, त्यास आकार देणारे आपल्यातूनच चांगले कलाकार, अभियंते, प्रशासक, नेते, कार्यकर्ते, देशरक्षक आणि समाजसुधारक घडविण्याच्या कामात ह्या लैकिक गुरूजनांची मोठी कामगिरी असते.
तसेच आपला प्रपंच सार्थ करून प्राप्त नरजन्माचे खऱ्या अर्थाने सार्थक करून देणारे सद्गुरू ह्यांचीही आपल्याला नितांत गरज असतेच. त्यांच्या मार्गदर्शनानेच त्यांनी दिलेल्या जीवन संदेशांनीच आपले जीवन हे घडत असते. त्याला एक वेगळाच आकार येत असतो. माणसांमधूनच माणसे आणि देवमाणसे घडविण्याची किमया ही त्या एका गुरूंनाच अवगत असते.