नवी दिल्ली – भारताची आर्थव्यवस्था सध्या खालावलेली असून आता इतर क्षेत्रांसोबतच ऑटोमोबाईल क्षेत्रातील आर्थिक मंदी उघड व्हायला सुरुवात झाली आहे. वाहन क्षेत्रात आलेल्या मंदीमुळे गेल्या आठवड्यात टाटा मोटर्सने उत्पादन थांबविल्याने खळबळ माजलेली असतानाच आता भारताची सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीनेही 1000 कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. यामुळे या मंदीचा विळखा वाढू लागल्याचे संकेत मिळत आहेत.
मारुती सुझुकीने नवीन भरतीवरही बंदी आणली आहे. तसेच मंदीपासून वाचण्यासाठी कंपनी विविध उपाययोजना करत आहे. गेल्या काही महिन्यांपासून मारुतीसह अन्य वाहन कंपन्यांच्या विक्रीने ऐतिहासिक घसरण नोंदविली आहे. जेव्हा मंदी येते तेव्हा कंत्राटी कामगार यांना पहिला फटका बसतो. मात्र, कंपनीने या प्रकरणावर कोणतेही भाष्य केलेले नाही. केवळ मारुतीलाच नाही तर अन्य ऑटो कंपन्यांनाही उत्पादन कमी करावे लागले आहे. यामुळे अतिरिक्त कर्मचाऱ्यांना कमी केले जात आहे.