सुलतानपूर – मद्यपी अधिकाऱ्यापेक्षा रिक्षाचालक किंवा एखादा मजूर हा चांगला नवरा ठरेल,त्यामुळे कोणत्याही दारूड्या इसमाला आपली मुलगी देऊ नका असे आवाहन असे केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री कौशल किशोर यांनी केले आहे. मद्यपीचे आयुष्य खूपच कमी असते,असे किशोर यांनी शनिवारी लंबुआ येथे एका व्यसनमुक्ती कार्यक्रमात संबोधित करताना सांगितले.
यावेळी त्यांनी आपला आपला वैयक्तिक अनुभव कथन केला. आपल्या मुलाचाही दारूच्या व्यसनामुळे मृत्यू झाल्याचे नमूद करून ते म्हणाले की, मी खासदार आणि माझी पत्नी आमदार असताना आम्ही आमच्या मुलाचे प्राण वाचवू शकलो नाही, तर सर्वसामान्य जनता कसे करणार असा सवाल त्यांनी केला.
माझा मुलगा (आकाश किशोर) याला त्याच्या मित्रांसोबत दारू पिण्याची सवय होती. त्याला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्यात आले. तो वाईट सवय सोडेल, असे गृहीत धरून सहा महिन्यांनी त्याचे लग्न केले. मात्र, त्याने पुन्हा दारू पिण्यास सुरुवात केली.दोन वर्षापुर्वी त्याचे निधन झाले त्यावेळी त्याचा मुलगा अवघा दोन वर्षांचा होता असे ते म्हणाले.
कौशल किशोर यांनी उपस्थितांना सांगितले की, “मी माझ्या मुलाला वाचवू शकलो नाही, त्यामुळे त्याची पत्नी विधवा झाली. तुम्ही तुमच्या मुली-बहिणींना यापासून वाचवा. व्यसनांमुळे दरवर्षी देशात 20 लाख लोकांचा मृत्यू होतो असे ते म्हणाले.