पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्य शासनाने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये १० टक्के आरक्षण दिले आहे. पण, मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी सरकारच्या भूमिकेवर आक्षेप घेत लोकसभेला मराठा समाजाने प्रत्येक मतदारसंघात उमेदवार देण्याची घोषणा केली आहे.
याचा फटका बसण्याचा धसका भाजपने घेतला असून प्रत्यक लोकसभा मतदारसंघात किमान दहा हजार मराठा घरांना भेटी देऊन त्यांचे दिलेल्या आरक्षणाबाबत मत तसेच त्यांचा कल जाणून घेण्याच्या सूचना भाजप पदाधिकाऱ्यांसह मित्रपक्षांना दिल्या आहेत.
लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपकडून प्रत्येकी तीन मतदारसंघांचे क्लस्टर तयार करण्यात आले असून पुणे, बारामती तसेच शिरूर मतदारसंघाची जबाबदारी उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. पाटील यांनी सोमवारी या तीनही मतदारसंघाच्या मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत या सूचना देण्यात आल्या आहेत. या बैठकीस राष्ट्रवादी काॅग्रेस, शिवसेना तसेच रिपाई ( आठवले गट) चे लोकसभा मतदारसंघाचे प्रत्येकी पाच पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत मराठा आरक्षणावरून निर्माण झालेल्या तिढ्यावर चर्चा करण्यात आली. शासनाने आरक्षण दिलेले असले तरी जरांगे यांनी आंदोलनाची भूमिका जाहीर केली आहे. त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणी मराठा समाजाचा कल जाणून घेतले जाणार आहेत. जे शासनाच्या विरोधात असतील त्यांना शासनाची भूमिका समजावून त्यांचा कल बदलण्याच्या प्रयत्न करावा, अशा सूचनाही देण्यात आल्या. तसेच पुण्यातील एका आमदाराकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.
बारामतीत भीती
बारामतीमध्ये या निवडणुकती विशेष कष्ट घ्यावे लागणार असून, त्यासाठी मित्रपक्षांनी मदत करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवारांचा उमेदवार असणार आहे. मात्र, ही लढत सोपी नसल्याची भीतीही यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यासाठी मदतीची आवश्यकता असल्याने मित्रपक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.