पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या परीक्षेद्वारे कृषी अधिकारी या पदावर शिफारस करण्यात आलेल्या १२१ उमेदवारांना नियुक्ती आदेश राज्य शासनाने तीन दिवसांपूर्वी दिले होते. त्यानुसार उमेदवार संबंधित पदावर रुजू होणार होते.
मात्र, कृषी अधिकारी पदासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल असून, न्यायालयाचे आदेश विचारात घेऊन प्रशासकीय कारण सांगून नियुक्तीचे आदेश रद्द करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.
कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागात कृषी सेवा गट ब (कनिष्ठ) या संवर्गातील कृषी अधिकारी पदावर नियुक्त करण्यात आलेल्या उमेदवारांसंदर्भात नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर १ मार्च २०२४ रोजी १२१ उमेदवारांच्या नियुक्तीचा आदेश प्रसिद्ध करण्यात आला होता. मात्र, प्रशासकीय कारणास्तव हा आदेश रद्द करण्यात येत असल्याचे परिपत्रक राज्य शासनाकडून सोमवारी प्रसिद्ध करण्यात आले आहे.
राज्य शासनातर्फे सुमारे दीड महिन्यापूर्वी तलाठी भरतीचा निकाल जाहीर करण्यात आला, तसेच गुणवत्ता यादी जाहीर करून उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली.
मात्र, या उमेदवारांना नियुक्ती दिली गेली नव्हती. कृषी अधिकाऱ्यांना नियुक्ती दिली जात असेल, तर तलाठी भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना नियुक्ती का दिली जात नाही? असा सवाल उपस्थित केला जात होता; परंतु आता कृषी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा आदेशही रद्द करण्यात आला आहे. परिणामी तलाठी पदास पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या नियुक्तीवरून उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.