मुंबई – जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडण्यात आल्याचा घटना समोर आल्याने राज्यभरात एकच खळबळ माजली. हा मुद्दा अर्थसंकल्पीय अधिवेशनातही चांगलाच गाजला. यावर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी केली होती. परंतु, पोलिसांवरील आरोपात तथ्य नसल्याची माहिती देशमुख यांनी दिली असून याप्रकरणी क्लीन चीट दिली आहे. तसेच ज्या महिलेने तक्रार केली आहे, ती वेडसर असल्याची तक्रार याआधी समोर आल्याचे गृहमंत्री यांनी सांगितले.
मात्र भाजप पक्षाने या घटनेवरून मविआ सरकारवर टीका केली आहे. याच संदर्भात भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी जळजळीत टीका केली आहे. त्यांनी ट्विट केले आहे की,’जळगाव महिला वसतिगृहाच्या गैर प्रकाराबद्दल महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांनी केलेला खुलासा सुसंस्कृत महाराष्ट्राची मान खाली घालायला लावणारा आहे… हाकला या अकार्यक्षम गृहमंत्र्याला. मी म्हणालोच होतो ठाकरे मंत्रिमंडळात अनेक शक्ती कपूर आहेत.’ असं म्हणत गृहमंत्र्यांची तुलना बॉलीवूड मधील शक्ती कपूरशी करत टीका केली आहे.