पटना – देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. करोनाच्या वाढत्या उद्रेकाबरोबर मृतांचा आकडादेखील वाढतच आहे. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत जागाही उरलेली नाही. अशावेळी मृतदेहांच्या नातेवाईकांना रांगेत तासनतास उभे राहावे लागत आहे. स्मशानभूमीत 24 तास चिता जळत आहेत. तर काही वेळेस सरणाअभावी अर्धवटच अंत्यसंस्कार केले जात आहे. अशातच बिहारमधील बक्सरमधून मानवी समुहाला लाजवेल असे हृदयद्रावक चित्र समोर येत आहे. यूपीच्या सीमेला लागून असलेल्या भागात गंगा नदीकाठी शंभराहून अधिक मृतदेह वाहताना दिसले.
खेडे गावांत एक-दीड महिन्यांपासून वाढत आहे मृतांचा आकडा –
बक्सरमधील चरित्रवन येथील लोकांचे म्हणणे आहे की, आजूबाजूच्या गावात गेल्या एक-दीड महिन्यांपासून अचानकपणे मृतांचा आकडा वाढला आहे. सोमवारी चरित्रवनमधील स्मशानभूमीत लोकांना जाळण्यासाठी जागा उरली नाही. दरम्यान, यामधील जास्तीत जास्त रुग्ण खोकला आणि तापीचे होते. चौसा स्मशानभूमीत येणार्या बहुतेक मृतदेहांना गंगेमध्ये टाकण्यात येत आहे. यामधील शेकडो मृतदेह गंगा नदीच्या किनार्यावर सडत आहेत.
#NewsAlert | Bihar: Over 100 dead bodies of reported Covid fatalities dumped in Ganga.
Details by Shyam. pic.twitter.com/swWpSpQyKU
— TIMES NOW (@TimesNow) May 10, 2021
या संपूर्ण प्रकरणात जिल्हा दंडाधिकारी मंगला प्रसाद सिंह यांनी गंगा येथे मृतदेह आढळल्याची माहिती दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, ही बाब त्यांच्या गावकऱ्यांनी निदर्शनास आणून दिली. प्रकरणाची माहिती मिळताच चौकशी पथकही घटनास्थळावर पाठविण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. यापूर्वी बिहारच्या बक्सर जिल्ह्यात गंगा नदीत कमीतकमी ३० मृतदेह सापडले होते. सापडलेल्या मृतदेह वाहून गेल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. असे म्हटले आहे की हे मृतदेह बिहारमधून नव्हे तर उत्तर प्रदेशातून आले आहेत, सध्या या प्रकरणाचा देखील तपास सुरू आहे.
दरम्यान, अंत्यसंस्कारासाठी लाकडं नसल्यामुळे किंवा आर्थिक समस्यांना सामोरे जाणाऱ्या गरीब लोकांनी बक्सरमधील गंगा येथे मृतदेहाचे विसर्जन केले, हे सत्य नसल्याचे बक्सरचे जिल्हाधिकारी अमन समीर यांनी सांगितले. तसेच गंगा नदीत तरंगताना मृतदेह आढळले असून त्यांच्यावर योग्यरित्या अंत्यसंस्कार करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.