जळगाव – राज्यातील तापमान मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्यातच राज्यातील आग लागण्याच्या घटना वाढत आहे. जळगावच्या जामनेर तालुक्यातील गारखेडा परिसरात घराला आग लागून दाम्पत्याचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. उत्तम श्रावण चौधरी (47) व वैशाली उत्तम चौधरी (44) अशी मृत पती पत्नीची नावं आहेत. या घटनेची माहिती शेजाऱ्यांना लागली नसल्याने कोणी बचावाला जावू शकलं नाही.
जामनेर तालुक्यातल्या गारखेडा इथं उत्तम चौधरी आणि त्यांची पत्नी वैशाली चौधरी हे दाम्पत्य राहत होतं. मध्यरात्री दोन वाजेच्यानंतर त्यांच्या घराला आग लागली. त्यावेळी चौधरी दाम्पत्य घरात झोपलेलं होतं. या आगीत होरपळून चौधरी दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. घराला आग लागली याची माहिती गावातही कोणाला मिळाली नव्हती. त्यामुळे कोणीही मदतीला जाऊ शकलं नाही.
दरम्यान पहाटेच्या सुमारास या ठिकाणाहून एक ट्रक चालला होता. त्या ट्रकचालकाला आग लागलेली दिसली, तेव्हा त्याने गावातील लोकांना झोपेतून उठवलं आणि चौधरी यांच्या घराला लागलेल्या आगीच्याबाबत त्यांना माहिती दिली. गावकऱ्यांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच दरवाजा तोडून सर्वांनी घरामध्ये प्रवेश केला. मात्र तोपर्यंत उशीर झालेला होता.