पुणे – कंटेन्मेंट झोन वगळून उर्वरित क्षेत्रामध्ये उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार एमआयडीसीतील कंपन्या सुरू झाल्या आहेत. या कंपन्यांमधील बहुतेक मजूर परप्रांतीय होते, आता हे सगळे मजूर गावी जात आहे. त्यामुळे कंपन्यांसमोर मनुष्यबळाची समस्या उभी राहिली आहे. त्यातच आता कंपन्यांना कामगार पुरविणारे ठेकेदार मजुरांची पळवापळवी करत असल्याच्या तक्रारी विभागीय आयुक्तांकडे आल्या आहेत.
लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्याने उद्योग-कंपन्या सुरू झाल्या आहेत. ग्रामीण भागातील कंपनी सुरू झाल्या आहेत. या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर परराज्यातील कामगार काम करत असतात. करोनाच्या भीतीमुळे कामगार आपल्या गावी जात आहेत. त्यामुळे या कंपन्याना कामगार मिळत नाही.
मजूर कमी आणि मागणी जास्त यामुळे ठेकेदार एकमेकांचे मजूर जादा पैसे देऊन दुसऱ्या कंपन्यांमध्ये नेत आहेत, अशी तक्रार कंपन्यांच्या संघटनेने केली आहे. तसेच मजूर जादा पैसे मागत असल्याची बाब आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे.