Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी 10 फेब्रुवारीपासून अंतरवाली सरटीमध्ये पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. त्यांनी अन्न, पाणी घेण्यास नकार दिला आहे. गेल्या चार दिवसांमध्ये मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे.
शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने मनोज जरांगे पाटील यांच्या नाकातून रक्तस्त्राव होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र असे असतानाही त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. एकीकडे मनोज जरांगे यांची प्रकृती खालावलीअसताना दुसरीकडे मराठा संघटना आक्रमक झाली असून विविध भागात बंद पुकारण्यात आला आहे.
मराठा समाजाने सोलापूर, मनमाड, बीड, बारामती आणि आळंदीत बंदची हाक दिली. या जिल्ह्यांमधील शहरी भागात बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर ग्रामीण भागात बंदला मिळणारा प्रतिसाद संमिश्र आहे. मराठा क्रांती मोर्चा कडून बारामती तालुक्यात बंद पाळण्यात आला आहे. शहरात आज आठवडे बाजार असल्याने व्यापारी महासंघाच्या वतीने दुपारपर्यंत या बंदला पाठिंबा देण्यात येणार असून दुपारनंतर व्यवसायधारकांनी आपली दुकानी उघडावीत, असे आवाहन व्यापारी महासंघाने केले आहे.
तसेच इंदापूर, दौंड, पुरंदरमध्ये देखील बंदला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मराठा समाज बांधवाकडून सोलापुरातील कोंडी गावात ही बंद पुकारला आहे. गावात सकाळपासून सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली असून केवळ अत्यावश्यक सेवा सुरु आहे. सरकारने दिलेला शब्द पाळून आरक्षणाची अंमलबजावणी करावी, मराठा बांधवाची भूमिका आहे.
“सगेसोयरे अध्यादेशाची अमंलबजावणी होईपर्यंत उपोषण सोडणार नाही”
दरम्यान, सोमवारी रात्री जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ आणि पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी देखील जरांगे यांना पाणी घेण्याची विनंती केली. मात्र, सगेसोयरे अध्यादेशाची अमंलबजावणी होईपर्यंत आपण उपोषण सोडणार नसून, पाणी देखील पिणार नसल्याची भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे.