जालना : राज्यात मागील १६ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलाच गोंधळ पाहायला मिळत होता. अखेर मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाची बसलेल्या मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज सकाळी जरांगे यांनी उपोषण सोडले. यावेळी मनोज जरांगे यांनी आपली प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय आपण मागे हटणार नसल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फळांचा रस घेत जरांगे यांनी उपोषण सोडले.. यानंतर उपस्थितांसमोर बोलताना मनोज जरांगेंनी पहिली प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगे पाटील म्हणाले, “राज्यातील ही पहिली घटना आहे म्हणून कौतुक करायला हवे. आतापर्यंत जे कधीच घडलं नाही, ते आज घडलं. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मराठा आरक्षणाच्या विषयात लक्ष घालून आमरण उपोषण सोडवायला जालन्यात आले. त्यांचे मराठा समाजाच्या वतीने त्यांचं टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत.” असे त्यांनी म्हटले.
पुढे बोलताना जरांगे यांनी, “या टाळ्यांचा विजय होईल हा शब्द देतो. तुमची टाळी वाया जाणार नाही. मी २९ ऑगस्टला आंदोलन सुरू झालं तेव्हापासून प्रत्येकवेळी सांगत होतो की, मराठा समाजाला न्याय देऊ शकणार असेल, तर फक्त एकनाथ शिंदे,” असे मत व्यक्त केले.
त्यासोबतच त्यांनी, “मला माझा समाज प्रिय आहे हे मी आधीपासून सांगत होतो. समाजाच्या हिताचा निर्णय घेईन आणि त्याशिवाय मागे हटणार नाही हे मी प्रत्येकवेळी सांगितलं आहे. तीच भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आहे. त्यांनीही आरक्षण दिल्याशिवाय मागे हटणार नाही, असं सांगितलं आहे,” अशी माहिती उपस्थितांना दिली.
दरम्यान, यावेळी “मराठा समाजाला आरक्षण देण्याची आमच्या सरकारच्या जबाबदारी असून, ती आम्ही देणारच असल्याचे मुख्यंमत्री शिंदे म्हणाले. मराठ्यांना आरक्षण देणं सरकारची इच्छा आहे. तसेच न्यायालयात टिकणारे आरक्षण आम्हाला द्यायचं आहे. पण, कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार” असल्याचे अश्वासन मुख्यंमत्री शिंदे यांनी यावेळी दिले.