Maratha Morcha – मनोज जरांगे यांची सरकारच्या शिष्टमंडळासोबत गुरुवारी झालेली चर्चा पुन्हा एकदा निष्फळ ठरली आहे. आम्हाला सरकारसोबत चर्चा करून मराठा आरक्षणावर तोडगा काढायचा आहे. आज सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेली चर्चा निष्फळ ठरली. आता एक मोठे शिष्टमंडळ येऊन आमच्याशी संवाद साधणार आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी लोणावळ्यात बोलताना सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालून तोडगा काढावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी सरकारला केले. सरकार व प्रशासनातील बडे अधिकारी चर्चेला येणार आहेत. आम्ही मुंबईच्या दिशेने चालत आहोत. रस्त्यात एखादे घर किंवा हॉटेलात त्यांच्याशी चर्चा केली जाईल. पण हे असेच सुरू राहण्याची शक्यता आहे.
त्यामुळे मी समाजासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना या प्रकरणी तोडगा काढण्याचे आवाहन करत आहे. त्यांनी पुढाकार घेतला नाही तर आमचे आझाद मैदानावर आमरण उपोषण होईल हे निश्चित आहे, असे जरांगे यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी सरकारच्या शिष्टमंडळासोबत बंद दरवाज्याआड चर्चा करण्याचा आरोपही फेटाळून लावला.
तत्पूर्वी, मराठा आरक्षणासाठी सरकारशी झुंज देणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मुंबईला शांततेत धडक देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. राज्य सरकारने आपल्यावर कितीही दबाव टाकला तरी मराठ्यांनी शांतता सोडायचा नाही. आपली शिस्त मोडायची नाही. आम्ही मुंबईला जाण्यावर ठाम असून, तिथे गेल्यानंतर आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे.