मुंबई – जागा काँग्रेसची असो, राष्ट्रवादीची असो की शिवसेनेची, सगळ्या जागा निवडून आणू असा निर्धार महाविकास आघाडीच्या (मविआ) पहिल्याच बैठकीत झाल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या चर्चेसाठी मविआची पहिली बैठक गुरुवारी मुंबईत पार पडली. या बैठकीनंतर तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
या बैठकीत राज्यातील सर्व ४८ जागांवर चर्चा झाल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी यांच्यासोबत आमची चर्चा सुरू असून यापुढच्या ३० तारखेच्या बैठकीला असतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जागा कुणाच्याही वाट्याला जावो, सर्व जागा निवडून आणण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आल्याचा पुनरूच्चार देखील त्यांनी केला.
आम्ही प्रसन्न मुद्रेने बाहेर आलोय. आमची सविस्तर चर्चा झाली. काँग्रेसकडून नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड होते, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड तर शिवसेनेकडून मी आणि विनायक राऊत, सीपीआय, सीपीएम देखील बैठकीली उपस्थित होते, असेही राऊतांनी यावेळी सांगितले.
आंबेडकरांचे समाधान झालेय
प्रकाश आंबेडकर यांचे समाधान झाले आहे. ३० तारखेला ते आमच्यासोबतच मिटिंगमध्ये येतील. त्यांचे प्रतिनिधी देखील असतील. आता त्यांचा जो गैरसमज होता तो दूर झाला आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले. तसेच, राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी देखील प्रकाश आंबेडकरांना फोन केला. आंबेडकरांनी त्यांच्या समस्या मांडल्या तेव्हा जयंत पाटील यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनाही कॉलवर जोडले.