Manoj Jarange Patil: मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केल्यानंतर सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र शुक्रवारी रात्री त्यांची अचानक प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली. छातीत दुखत असल्याने जरांगे यांच्यावर रात्रीच तातडीने उपचार सुरु करण्यात आले.
मनोज जरांगे यांची मध्यरात्री अचानक तब्येत बिघडली आणि त्यांच्या छातीत दुखू लागले होते. त्यांच्यावर खाजगी डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले आहेत. यावेळी त्यांचा एसीजी काढण्यात आला. एसीजी नॉर्मल असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. त्यानंतर अशक्तपणा जाणवत असल्याने त्यांना रात्री उशिरा सलाईन लावण्यात आले आहेत. आता त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र शुक्रवारी त्यांना डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला आणि ते आंतरवालीला पोहचले होते. मात्र, रात्रीच अचानक त्यांच्या छातीत दुखूत असल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यासाठी संभाजीनगरच्या डॉक्टरांचं पथक तात्काळ आंतरवालीत पोहचले होते.
मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं – मनोज जरांगे
महाराष्ट्र सरकारकडून मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्यात आले आहे. मात्र मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं, अशी त्यांची मागणी आहे. मराठा समाजाच्या आग्रहानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं. उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे मराठा समाजाकडून त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली जात होती. मनोज जरांगे यांचं अंतरवली सराटी गावात गेल्या काही दिवसांपासून उपोषण सुरु होतं.
यादरम्यान त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. ते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुंबईला देखील निघाले होते. पण दुसऱ्याच दिवशी ते पुन्हा अंतरवली सराटी गावात आले. त्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली. पण तरीही मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरुच राहील असे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच सध्या उपोषण सोडलं असलं तरी साखळी उपोषण सुरुच राहील, असे देखील त्यांनी स्पष्ट केले होते.