-अमित डोंगरे
रवीचंद्रन अश्विनच्या इशाऱ्याने पुन्हा एकदा यंदाच्या आयपीएल स्पर्धेत मांकडिंग विकेटचे कवित्व सुरू झाले आहे. नॉन स्ट्राइकर फलंदाजाने गोलंदाजाने चेंडू टाकण्यापूर्वी क्रीझ सोडले तर गोलंदाजाला त्याला बाद करता येते. क्रिकेटच्या नियमानुसार तो फलंदाज बादही असतो. मात्र, ही कृती क्रिकेटच्या खिलाडूवृत्तीला छेद देणारी असल्याने अनेक गोलंदाज फलंदाजाला केवळ तंबी देतात.
गेल्या वर्षीच्या आयपीएल स्पर्धेत अश्विनने याच पद्धतीने जोस बटलरला बाद केले होते व त्यावरून प्रचंड टीकाही झाली होती. त्यावेळी अश्विनने बटलरला तंबी दिलेली नव्हती. मात्र, अशी तंबी देण्याची खिलाडूवृत्ती नियमांत नोंदलेली नाही, असे त्याने स्पष्ट केले होते. आता यंदाच्या स्पर्धेत अश्विन दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळत आहे व संघाचे प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग आहेत. त्यांनी या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच अश्विनला अशा पद्धतीने कोणत्याही खेळाडूला बाद करायचे नाही असे सांगितले होते. मंगळवारच्या सामन्यात अश्विनने ऍरन फिंचला तंबी दिली.
अश्विनने चेंडू टाकण्यापूर्वीच फिंच क्रीझच्या बाहेर आला होता व त्याला बाद करण्याची अश्विनला संधीही मिळाली होती. मात्र, तरीही त्याने फिंचला बाद केले नाही. सामना संपल्यावर अश्विनने सर्व संघांतील खेळाडूंना ही तंबी दिली व पुन्हा माझ्याकडून अशा खिलाडूवृत्तीची अपेक्षा करू नका, असेही सांगितले व आपला इरादा स्पष्ट केला.
मुळात या पद्धतीने बाद होणारा बटलर हा जागतिक क्रिकेटमधील काही पहिलाच फलंदाज नाही. यापूर्वीही असे अनेक फलंदाज बाद झाले आहेत व त्यावेळी त्यांना बाद करणाऱ्या गोलंदाजांवर टीकाही झाली आहे. सज्जनांच्या खेळाला डागाळले गेले वगैरे शब्दात जाणकारांनी टीकाही केली. अर्थात त्याचवेळी वेस्ट इंडिजचा कोर्टनी वॉल्श व भारताचा कपिल देव यांचे उदाहरहण डोळ्यांत अंजन घालणारे आहे. या दोघांनीही एकदा अशा पद्धतीने फलंदाजाला बाद करण्याचे टाळत केवळ तंबी दिली होती. यानंतर त्यांचे जगभरात कौतुकही झाले होते.
मात्र, ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटच्या सूत्राप्रमाणे विजय हा विजय असतो व तो कसा का मिळेना त्याला महत्त्व नसते. कपील देव यांनी जेव्हा 1992 साली झालेल्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या पिटर क्रीस्टन या फलंदाजाला या पद्धतीने बाद केले तेव्हा तर खूप मोठे वादळ निर्माण झाले होते.
1947-48 साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत विनू मांकड यांनी बिल ब्राऊन या फलंदाजाला एकदा क्रीझ न सोडण्याची तंबी दिली होती. मात्र, मांकड यांनी चेंडू टाकण्यापूर्वीच त्याने पुन्हा क्रीझ सोडले. त्यावेळी मांकड यांनी त्याला बाद केले. पंचांनीही त्याला क्रिकेटच्या नियमानुसार धावबाद ठरवले होते.
त्यावेळीही मांकड यांच्यावर टीका झाली होती, पण जे नियमात आहे तेच मी केले असे सांगत मंकड यांनी नियमाचाच आधार घेतला होता.
सर डॉन ब्रॅडमन यांनीही मांकड यांची पाठराखण करत या वादाला पूर्णविराम दिला होता. यंदा अश्विनने जो इशारा दिला त्यावरही काहींच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, जर अशा पद्धतीने फलंदाजाला बाद करणे क्रिकेटच्या नियमातच बसते तर त्यात गैर काय. असो, अश्विनच्या या भूमिकेमुळे या स्पर्धेत मांकडिंग बाद बाबतचे कवित्व अजूनही सुरूच राहणार हे स्पष्ट दिसत आहे.
क्रिकेट हा सभ्य माणसांचा खेळ आहे असे म्हटले जाते. मग गोलंदाजाने चेंडू टाकण्यापूर्वीच फलंदाजाने क्रीझ सोडले असेल तर त्याला धावाचोर म्हटले पाहिजे असे कपिल देव म्हणाले होते. त्याने नियम पाळला तर गोलंदाजाला कोणत्याही फलंदाजाला अशा पद्धतीने बाद करावेच लागणार नाही. चूक फलंदाजाने करायची व त्याला बाद केले तर टीका गोलंदाजावर करायची, असा पक्षपात या सज्जनांच्या खेळात कशासाठी हा देखील प्रश्न उरतो.