इंदापूर तालुक्यात प्रशासनाची जुजबी कारवाई
रेडा – इंदापूर तालुक्यातील उजनी जलाशय पट्ट्यात भीमा नदीच्या पात्रालगतच सरकारने बंदी घातलेल्या मांगूर माशांची शेकडो तळी आहेत, त्यामुळे या परिसरातील नागरिक उग्रवास व साथीच्या आजाराने हैराण झाले आहेत. कालठण, शहा, पडस्थळ या भागांतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मागील काही दिवसांत मत्स्य विभागाने जुजबी कारवाई केली मात्र विषारी मांगूर मासा पाळणारे माफिया तसेच मोकाट राहिले आहेत. एक-दोन गावांत नाही तर डझनभर गावांत या विषारी माशांचे संगोपन करून विक्री केली जाते. यावर ठोस कारवाई होणार का, असा प्रश्न तालुक्यातील नागरिक करीत आहेत.
गोडवा मासा नामशेष होण्याच्या मार्गावर
उजनी जलाशय परीसरात आता विषारी मासा निर्माण झाला आहे. मांगूर माशांचा टॅंक फुटल्यावर उजनी जलाशयात दाखल झाल्याने गोडवा, कानिश्या, रघू, कटला, गुगुळी, शिंगटा असे अनेक गोडवे मासे भक्ष्य झाल्याने ऐकीकाळी खाण्यासाठी मासा नामशेष होऊ लागला आहे. मांगूर मासा पाण्यातून बाहेर काढल्यावर देखील एक तासभर जिवंत राहतो, त्यामुळे जिवंत मासा म्हणून ग्राहक अभ्यास न करता खरेदी करतात.
कालठण नं 1, कलठन नं 2, कळाशी, आगोती, चांडगाव, पळसदेव, डाळज, वांगी, कांदलगाव, चांडगाव, भादलवाडी, भिगवण, सुगाव, पडस्थळ, शहा, आजोती, पिंपरी या गावांच्या हद्दीतील शेतात खासगी शेतकऱ्यांनी बेकायदेशीर मांगूर माशांची तळी केली आहेत. हा मासा पोसण्यासाठी कत्तल खान्यातील उर्वरित अवशेष वापरले जातात, त्यामुळे उजनी धरण पात्रातील पाणी दूषित झाले आहे. बॅकवॉटर पट्ट्यात हजारो मांगूर माशांची तळी आहेत. हा मासा शरीराला अपायकारक आहे. हा मासा खाण्यात आला तर अनेक आजार होतात. यामध्ये हृदयरोग, कर्करोग यांसारखे गंभीर आजारांना नागरिकांना बळी पडावे लागते.
मांगूर मासा तलावातील घाण पाणी चार दिवसाला थेट उजनी जलाशयात सोडले जाते, त्यामुळे परिसरातील विहिरीचे पाणी या पाण्यामुळे दूषित झालेले आहे. गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या योजना दूषित पाण्याने माखल्या आहेत. या संदर्भात इंदापूर पोलीस स्टेशन, खडकवासला जलसंपदा विभाग, तहसीलदार, उपविभागिय अधिकारी, जिल्हा अधिकारी, मत्स्य आयुक्त पुणे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, यांच्याकडे तक्रारी करून देखील कोणत्याही प्रकरची ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. तिलापी, रोहू, कटला, मृगल या सरकारची परवानगी असणाऱ्या माशांचे संवर्धन केले तर त्यांचा चरितार्थ उत्तम प्रकारे चालू शकेल.
इतर गावांत कारवाई न झाल्याने जोमाने बेकायदेशीर तळी जोपासली जात आहेत. व्यवसाय करण्यासाठी पुणे, मुंबई, दादर, नाशिक, दिल्ली या बाजारपेठेत हा मांगूर मासा पाठवला जातो. मांगूर मासा बेकायदेशीर तळी जर बंद झाली नाहीत, तर नागरिकांना कोरोनासारखे रोग पसरल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे प्रशासनाने बंदी असलेला मांगूर मत्स्यपालन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
इंदापूर तालुक्यात मांगूर माशांची मत्स्यपालन करणारे 80 तलाव आहेत. त्यापैकी 78 जणांवर यापूर्वीच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तालुक्यातील कालठण नंबर 1, कांदलगाव, शहा, भीमा नदीपात्राच्या लगत उजनी पाणलोट क्षेत्रात असलेल्या गावांमध्ये सुमारे जवळपास 80 मांगूर अवैधरित्या संवर्धन करणारी तळी आहेत. यातील कालठण गावातील 26 व्यक्तींवर सध्या न्यायालयात केसेस सुरू आहेत. तर तालुक्यातील एकूण 74 इसमांवर गुन्हे दाखल केलेले आहेत. काही मांगूर मासा तलावातील पाणी खोल आहे. कालठण नं. 1 मध्ये असणारा मांगूर माशांचा संपूर्ण साठा नष्ट होईपर्यंत ही कारवाई सुरु राहणार आहे.
-अविनाश नखवा, सहायक आयुक्त मत्स्य विभाग.