कामशेत (वार्ताहर) – गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी रासायनिक खताच्या किमतीत 15 ते 20 टक्क्यांनी घट झाली आहे. याचा फायदा हंगामी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना होणार आहे.
गेल्या वर्षी रासायनिक खतांच्या किमती 35 ते 40 टक्क्यांनी वाढ झाली होती. त्यामुळे रासायनिक खते महागल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ झाली होती, मात्र यावर्षी रासायनिक खतांच्या किमतीमध्ये 15 ते 20 टक्क्यांपर्यंत घट झाल्याने शेतकरी सुखावला आहे. जवळपास पन्नास किलोच्या खताच्या गोणीमागे अडीचशे रुपये घटले आहेत. आणि याचा फायदा हंगामी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना होणार आहे.
तसेच सध्या सर्वत्र उसाची तोड सुरू असून, उसाची तोड झाल्यानंतर उसाच्या खोडांना खत टाकली जातात. त्यामुळे उस उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
खताच्या विक्री पद्धतीत डिजिटलायझेशन झाले आहे. प्रत्येक खत विक्रेत्यास पॉसमशीन दिल्याने खताच्या साठ्यावर नियंत्रण आल्याने किमती नियंत्रणात आल्या आहेत. शासनाच्या सुविधेचा फायदा निश्चितच शेतकऱ्यांना मिळणार आहे.
– लखन राठी, खताचे व्यापारी.