आकार लहान करणार : उत्सवात भव्यदिव्यता टाळणार
पुणे – पुण्यातील मानाच्या पाचही गणेशमंडळांनी मांडव टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, शासन निर्देशांच्या अधीन राहून कोणताही भपकेबाजपणा, भव्यदिव्यता न ठेवता दरवर्षीपेक्षा लहान मंडप टाकण्यात येणार आहेत.
“अखिल मंडई गणेशोत्सव मंडळा’ने या आधीच उत्सव मंदिरात होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यापाठोपाठ “श्रीमंत दगडूशेठ गणेशोत्सव मंडळा’ने आणि “श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडळा’ने मंदिरातच उत्सव करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कसबा, तांबडी जोगेश्वरी, गुरूजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा यांनी मांडव घालण्याचा निर्णय घेतला आहे.
“राज्य सरकारने दिलेले निर्देश हे मंडप घालूच नका असे नाहीत. ज्या गणेश मंडळांची मंदिरे आहेत त्यांना मंडप घालू नका असे सुचवले आहे. परंतु मंडपांना विरोध नाही. त्यातून मागील वर्षीच्या परवानगीही यावर्षी महापालिका प्रशासनाकडून तशाच ठेवल्या गेल्या आहेत. त्यामुळे मंडप घालण्याचा निर्णय या पाचही मंडळांनी घेतला आहे. मात्र, दरवर्षी ज्या धुमधडाक्यात आणि भव्यदिव्य स्वरूपात उत्सव साजरा केला जातो, तो यंदा होणार नाही. धार्मिक विधी करून हा उत्सव पार पाडला जाईल, असे या गणपती मंडळांच्या प्रमुखांनी स्पष्ट केले आहे.
कसबा गणपती -मंडळाने मंडपाचा आकार कमी करून तो एक तृतियांश केला आहे. गणेशोत्सव साध्या पद्धतीनेच परंतु विविध समाजोपयोगी उपक्रमांनी तो साजरा करणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी सांगितले.
तांबडी जोगेश्वरी -मंडळाने मंडपाचा आकार पाच फुटांनी कमी करून तो 12 फुटांवर आणला आहे. खासदार गिरीश बापट यांच्या हस्तेच सोमवारी नारळ वाढवून मंडप टाकण्याला शुभारंभ करण्यात आला. परिसरातील दुकानांचा व्यवसाय बंद करता येत नाही. जागाच नसल्याने मंडपातच श्रींची मूर्ती ठेवणे आवश्यक आहे.
यंदा राज्यसरकारच्या निर्देशाप्रमाणे मंडपाचा साइज कमी केल्याचे जोगेश्वरी गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख राजाभाऊ टिकार यांनी सांगितले. याबाबत फरासखान्यातील पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनाही बोलावून सद्यपरिस्थिती दाखवली आहे. याशिवाय विविध उपक्रम मंडळातर्फे आयोजित केले जाणार असल्याचे टिकार म्हणाले.
मानाच्या पाच गणपतींनी…
गुरूजी तालीम -मंडळाचा मांडव दरवर्षी 40 बाय 50 आकाराचा मंडप असतो. यंदा तो 16 बाय 20 चाच असेल. मंडळाची मूर्ती जेथे ठेवली जाते ते मंदिर अतिशय छोटे आहे. तेथे एक व्यक्तीही उभी राहू शकत नाही. त्यामुळे मंडप टाकण्याचा निर्णय घेतल्याचे मंडळाचे राजू परदेशी यांनी सांगितले.
तुळशीबाग -मंडळाचा गणपती तर अगदी तुळशीबागेतच बसतो. यंदा या भव्यदिव्यतेला मंडळाने फाटा दिला असून अतिशय साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी 70 बाय 30 फुटांचा मंडप, सजावट, चार कमानी, डेकोरेटिव्ह खांब अशी तुळशीबाग गणपतीची शान असते. यंदा मंडपाचा साइज 15 बाय 10 करण्यात आला असून, सजावटीला पूर्णपणे फाटा देण्यात आला.
दर्शनासाठी आलेल्या मान्यवरांच्या हस्ते आरती केली जात होती, यंदा सकाळी आणि संध्याकाळीच ही आरती केली जाणार असून, प्रसादाचेही वाटप होणार नसल्याचे मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर यांनी सांगितले. सॅनिटायझर आणि सुरक्षेचे सर्व उपाय करण्यात येतील, असे खटावकर यांनी सांगितले.
केसरीवाडा -मागच्या वर्षीपर्यंत मुख्य दरवाजापर्यंत मंडप टाकण्यात येत होता. परंतु, आता याग करण्यापुरता मंदिरासमोरच छोटा मंडप टाकला जाणार आहे. मंडळाचा गणपती हा मंदिरातच विराजमान होतो, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी दिली आहे.