नागनाथ डोंबे
सर्वपक्षीय नेत्यांचे महादेव जानकरांना साकडे
अर्जुन कोणालाही करा, पण परिवर्तन करण्याचा आग्रह
म्हसवड – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माण- खटाव विधानसभा मतदारसंघात “आमचं ठरलयं’ वरून मोठे महाभारतच सुरू झाले आहे. माजी आमदार जयकुमार गोरे यांच्या भाजप प्रवेशाने तालुक्यातील सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील नेते मंडळीनी परिवर्तनासाठी कुरूक्षेत्राची तयारीच केल्याचे दिसून येत आहे. या महाभारताची सुरवात हरणाई सुत गिरणीचे संस्थापक अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी नुकतीच म्हसवड येथे मंत्री महादेव जानकर यांच्या नागरी सत्काराच्या निमित्ताने केली.
जानकर यांना या कुरूक्षेत्रावर श्रीकृष्णाच्या भूमिकेत उतरवून “काय पण करा, कुणाला पण अर्जुन करा. पण माण-खटाव मतदारसंघ रासपलाच घ्या,’ असा सूर सर्वच सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेत्यांमधून उमटू लागला असून एकीकडे भाजपात प्रवेशाची महाभरती सुरू असताना माण -खटावमध्ये मोठे महाभारत सुरू झाले आहे माण मतदारसंघात इच्छुकांची संख्या जास्त असली तरी जयकुमार गोरे यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजप प्रवेश केल्यामुळे सर्वच सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षातील नेतेमंडळी एकवटून काही झाले तरी तालुक्यात परिवर्तनासाठी “आमचं ठरलयं’ या घोषणेखाली एकत्र येऊ लागल्याचे चित्र आहे.
रणजितसिंह देशमुख यांनी रासपचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांच्या नागरी सत्काराचा कार्यक्रम घेतला. व्यासपीठावर भाजपसह, रासप, राष्ट्रवादी, कॉंग्रेसची तालुक्यातील दिग्गज नेतेमंडळी हजर होती. माजी खासदार रणजितसिंह मोहिते- पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार प्रभाकर घार्गे, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा कार्याध्यक्षा प्रा. कविता म्हेत्रे, संदीप पोळ, भास्करराव गुंडगे, शिवाजीराव शिंदे, माजी नगराध्यक्ष विलासराव माने, नगराध्यक्ष तुषार विरकर, प्रा. विश्वंबर बाबर, युवराज बनगर, कॉंग्रेसचे एम. के. भोसले, मामूशेठ विरकर, सुनील नेटके आदी नेते मंडळी उपस्थित होती.
कार्यक्रमात सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी जानकर यांना “आता या तालुक्यात विधानसभा निवडणुकीच्या कुरूक्षेत्रावर श्रीकृष्णाची भूमिका बजवावी पण तालुक्यात परिवर्तन करावे, यासाठी आम्ही सर्व नेतेमंडळी तुमच्या पाठीशी उभे राहू,’ असा आग्रह धरला. या लढाईत अर्जुन कोणालाही करा, पण श्रीकृष्णाची भूमिका जानकर यांनीच बजवावी, असा सुर उमटला. यावर जानकर यांनी “तुम्ही निश्चिंत राहावा माण खटावची जागा मलाच मिळणार आहे. मला चार जागा कमी द्या, पण माझ्या मातृभूमीची माण खटावची जागा मला द्या, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकड केली आहे, असे स्पष्ट केले. तुम्ही सर्वानी एकत्र येऊन एकदिलाने माझ्या पाठीशी राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.
त्यामुळे परिवर्तनासाठी तालुक्यातील सत्ताधारी पक्षांसह विरोधी पक्षांतील नेतेमंडळीचे मोठे लॉबिंग सुरू आहे. रणजितसिंह देशमुख यांनी हा कार्यक्रम घेऊन मोठी राजकीय खेळी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. कारण “एनडीए’तील एक महत्वाचा घटक पक्ष असलेल्या रासपला गेल्या निवडणुकीत भाजपच्या कोट्यातून जागा देण्यात आली होती. त्यावेळी रासपकडून शेखर गोरे रिंगणात होते. त्या निवडणुकीत शेखर गोरे यांना दुसऱ्या क्रमांकाची 53 हजार मते मिळाली होती. त्यावेळी शिवसेना व भाजप वेगवेगळे लढले होते.
यावेळीही तीच परिस्थिती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्यावेळी निसटता पराभव झाला असला तरी यावेळी शेखर गोरे सध्या शिवसेनेत असून ते या निवडणुकीतील तगडे उमेदवार समजले जात आहेत. घटक पक्ष असलेल्या रासपला माणची जागा जर भाजपकडून सोडण्यात आली तर मात्र नुकताच प्रवेश केलेल्या जयकुमार गोरे याची मात्र मोठी अडचण होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षातील नेतेमंडळी हा मतदारासंघ रासपच्या वाट्याला जाईल, अशी आशा बाळगून आहेत. जयकुमार गोरेंना रोखण्यासाठी मोठे महाभारत सुरू झाल्याने आता तालुक्यातील भाजपची जुनी नेतेमंडळी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.