भिर्रर्र आवाज ऐकण्यासाठी शौकीन आसुसले
अणे – पुणे व अहमदनगर जिल्ह्यातील काही तालुक्यातील यात्रांना या वर्षी बैलगाडा बंदी असल्याने शोभा आली नाही. कित्येक दिवस बैलगाडा शौकिनांनी भिर्रर्रर्र…चा आवाज ऐकला नाही.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेतेमंडळी बैलगाडा शर्यतवरील बंदी हटवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे सांगून आपली पोळी भाजून घेतात; परंतु नंतर त्यांना विसर पडतो शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संसदेत भाषण करून थांबलेल्या बैलगाडा शर्यतीला पुन्हा एकदा वाचा फोडली; परंतु नेमके घोड कुठं घडतंय, ते अजून गुलदस्त्यातच आहे. न्यायालयाने बैलगाडा शर्यत बंदी घातली असून बंदी उठवण्यासाठी सत्ताधारी व विरोधी पक्षाचे नेते मंडळी बरोबर बैलगाडा संघटनाही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. सर्व नेतेमंडळी अंग झटकून कामाला लागली होती; मात्र एवढे करूनही बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठत नसल्याने बैलगाडा शौकीन नाराज आहेत.
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बैलगाडा शर्यत हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. ग्रामीण भागात गेल्या कित्येक वर्षांपासून बैलगाडा शर्यत भरण्याची परंपरा सुरू होती. प्रत्येक गावात जत्रेत बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जाते. या बैलगाडा शर्यतीसाठी बैलगाड्याचा जुंपले जात त्या बैलांना शेतकरी जीवापाड जपत असतो. त्या बैलांना पदरमोड करून सकस आहार दिला जातो. बैलगाडा शर्यती असून शेतकऱ्यांना आर्थिक कमाई होते असे नाही परंतु गेल्या अनेक वर्षापासून पदरमोड करून ही परंपरा सुरू आहे. बैलगाडा शर्यत हा शेतकऱ्यांचा आनंद आणि उत्साह देणारा खेळ आहे.
2007मध्ये प्राणीमित्र संघटनेने बैलगाडा शर्यतीबाबत न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर शर्यतीवर बंदी घातली त्यावर न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर तात्पुरती स्थगिती आणली. पुन्हा 2014ला बंदी आल्यानंतर 2017मध्ये न्यायालयाने काही नियम व अटी बैलगाडा शर्यत सुरू करण्याची परवानगी दिली. त्यावर प्राणीमित्र संघटनेने आक्षेप घेत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेमुळे बैलगाडा शर्यत बंद झाल्या त्या अद्याप बंद आहेत. काही ठिकाणी यात्रेमध्ये बैलगाडा शर्यती घेण्याचा प्रयत्नही झाला त्यावेळी बैलगाडा मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
न्यायालयाच्या आदेशानुसार बैलगाडा शर्यतीवर बंदीची कडक अंमलबजावणी करण्यात आली. या बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू व्हायला म्हणून आंदोलने झाली. यावेळी लोकप्रतिनिधींनी बैलगाड्यांवरील बंदी उठवण्याबाबत प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. वेळप्रसंगी कायद्यातही बदल करून असेही शासनकर्त्यांनी सांगितले; परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. शासन कर्त्यांनी बैलगाडा मालक संघटनांबरोबर बैठका घेतल्या केंद्र शासनाचे उंबरठेही झिजवले; परंतु आंदोलनकर्त्यांच्या सगळ्या मेहनतीवर पाणी पडले.
राज्यातून परवानगी; मात्र…
राज्य शासनाने विधानसभा व विधानपरिषदेत बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी हे विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतर त्यावर राज्यपाल व राष्ट्रपतींची सहीही झाली; परंतु एवढे प्रयत्न करूनही बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली नाही. याचं कोडं बैलगाडा मालक आणि बैलगाडा शौकीन यांना मात्र सोडणं घडलं झालं आहे.
बैलगाडा शर्यतीसंदर्भात कर्नाटक व तामिळनाडू सरकारने केलेला कायदा व महाराष्ट्र शासनाने केलेला कायदा हा सारखाच आहे. असे असतानाही कर्नाटक व तामिळनाडूत जलीकट्टूचे खेळ सुरू आहेत. मग महाराष्ट्रासाठी वेगळा नियम कशासाठी? एकतर सर्वांना परवानगी द्यावी किंवा सर्वांच्या शर्यती बंद कराव्यात.
-संदीप बोदगे, अध्यक्ष नगर-पुणे बैलगाडा मालक संघटना
बैलगाडा शर्यत बंद झाल्याने आम्ही गतवर्षी रिव्हर्स ट्रॅक्टर ट्रॉली स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. यातून आम्ही नंबर काढले व जिंकलेल्या स्पर्धकांना बक्षीस देण्यात आले. बैलगाडा शर्यत पुन्हा चालू व्हायला पाहिजेत, अशी आमची मागणी कायम आहे.
-जयवंत घोडके, बैलगाडा शर्यत शौकीन