शिरूरपेक्षा आंबेगावला अधिक पसंती
पुणे – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांच्या शिवसेना प्रवेशाच्या वावड्यांनंतर बड्या नेत्यांची “धांदल’ उडणार आहे. कुस्तीच्या आखाड्याबरोबरच राजकारणातही वेगवेगळे “डाव’ टाकणारे बांदल “घड्याळ सोडून शिवबंधन’ बांधत असल्याने त्यांची पसंती ही “शिरूर’पेक्षा “आंबेगाव’ला अधिक असल्याची दिसते. याचे कारण म्हणजे युतीच्या जागावाटपात आंबेगाव शिवसेनेला तर शिरूर मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आहे.
बांदल यांचे यापूर्वीचे राजकारण पाहता त्यांनी नक्कीच वेगवेगळे “डाव’ टाकले आहेत. बहुतांश वेळा ते यशस्वीही ठरले आहेत. 2009चा विधानसभेचा अपवाद वगळता त्यांनी पराभवाचे तोंड पाहिले नाही. त्यांच्या “ताकदी’चा अंदाज असल्यानेच अनेकदा नेतृत्त्वाशी पंगा घेऊनदेखील राष्ट्रवादी कॉंगेसने त्यांनी जवळच केले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी बांदल यांनी “दंड’ थोपटले असता या पैलवानाला थेट राज्यपातळीवरील पद देत शरद पवार यांनी “शांत’ केले होते; परंतु बांदल यांच्या म्हणण्यानुसार केवळ पदावर “खुश’ होणारे ते नाहीत. तर विधानसभेसाठी “शब्द’ घेतल्यानंतरच त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा लोकसभा निवडणुकीत प्रचार केला आहे. आता “कसोटी’ राष्ट्रवादी नेतृत्त्वाची आहे.
राष्ट्रवादीतूनच लढायचे ठरल्यास “आंबेगावा’तून दिलीप वळसे पाटील यांची उमेदवारी निश्चित असल्याने त्यांच्यापुढे शिरूर-हवेलीचाच “पर्याय’ आहे. येथे नव्याने उमेदवार द्यायचा की माजी आमदार अशोक पवार यांनाच कायम ठेवायचे? की “आयत्या’वेळी हवेलीला संधी द्यायची. हा “पेच’ राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाला सोडवावा लागेल. शिरूर-हवेलीच्या वादात “सुवर्णमध्य’ म्हणून बांदल हे नाव चपखल बसते; परंतु या “गड्या’वर किती भरोसा ठेवायचा? प्रसंगी पक्षनेतृत्त्वालाही न जुमानणारे बांदल यांना यासाठी “पक्षनिष्ठा’ दाखवावी लागेल.
वळसे पाटीलांसाठी निवडणूक सोपी नसणार
होणाऱ्या चर्चेप्रमाणे बांदल यांनी खरेच शिवसेनेचा पर्याय स्विकारल्यास ते आंबेगावातून लढतील. शिवसेनाही इथे प्रबळ उमेदवाराच्या शोधात आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची राज्यात येण्याची इच्छा नाही. यापूर्वीही आढळराव यांनी घरातला उमेदवार उतरवला आहे. त्यांचे पूत्र अक्षय आढळराव पाटील हे विधानसभेच्या पार्श्वभूमिवर मतदारसंघात फिरत असले तरी ते त्यामानाने “नवखे’च आहेत. राजाराम बाणखेले शिवसेनेच्या तिकिटावर लढण्यास उत्सुक आहेत; परंतु आढळराव यांच्याशी त्यांचे ताणलेले “संबंध’ लक्षात घेता बांदल हे येथे “मातब्बर’ उमेदवार ठरू शकतात.
…तर अपक्ष लढण्याचीही तयारी
लोकसभा मतदारसंघात मंगलदास बांदल यांनी संपर्क कायम ठेवला आहे. सर्व पक्षांच्या व्यासपिठावर “दिलखुलास’ मिरवण्याची त्यांची “अदा’ “दाद’ मिळवून जाते. सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे असणारे “संबंध’ यामुळे ते “लोकप्रिय’ आहेत. कोणत्याही पक्षाचे तिकिट मिळूदेत प्रसंगी “अपक्ष’ लढण्याचीही तयारी त्यांची असते. अपक्ष लढूनही “विजय’ कसा मिळवायचा? याची रंगीत तालीम जिल्हा परिषद, बाजार समिती आदी निवडणुकांमध्ये पाहायला मिळालीच आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रवेश नाहीच झाला अन् राष्ट्रवादीनेही तिकिट नाकारले तर त्यांच्याकडून “स्वबळा’वर लढण्याची “पुनरावृत्ती’ विधानसभेलाही झाल्यास आश्चर्य वाढायला नको!
शिरूरमधून एक दावेदार कमी?
बांदल यांच्या शिवसेना प्रवेशाने शिरूर-हवेली मतदारसंघात राष्ट्रवादीचा एक “दावेदार’ कमी होईल. यामुळे राष्ट्रवादीचे इच्छुक सुटकेचा निःश्वास टाकतील. तरीदेखील आघाडीच्या उमेदवाराला येथील निवडणूक “सोपी’ नसेल. कारण माजी आमदार अशोक पवार व बांदल यांचे “सख्ख्य’ सर्वांना ठाऊकच आहे. त्यातच भाजपच्या बाजूने वाहणारे “वारे’, मंगलदास बांदल यांची “वक्तृत्त्वशैली’ यामुळे स्थानिक पातळीवर “ताकद’ असूनदेखील निवडणूक जिंकण्यासाठी येथील राष्ट्रवादीच्या उमेदवाराला “घाम’ गाळावा लागणार आहे. ऐनवेळी होणारी “बंडखोरी’ टाळणे हेही आव्हान पक्षापुढे असेल.