हिंजवडी (रमेश ससार) – राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेल्या माण-हिंजवडी रस्त्यालगत हजारोंच्या संख्येने अतिक्रमण वाढल्याने तसेच आयटीतील एक व्यक्ती एक वाहन धोरण त्यातच स्थानिकांचे डंपर, जेसीबी व कॉंक्रीट वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे माण रस्ता वाहतूक कोंडीच्या गर्तेत अडकला आहे. पर्यायाने या रस्त्यावर वाहतूक कोंडी व चक्काजामची समस्या नित्याची झाली आहे.
बेशिस्त वाहनचालकांमुळे हिंजवडी-माण रस्ता वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकला आहे. त्यातच राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यानाच्या तिसऱ्या फेजकडे जाणाऱ्या आयटीतील कर्मचाऱ्यांनी एक व्यक्ती एक कार हे धोरण अवलंबिल्याने या रस्त्यावर चार चार किलोमीटर वाहनांच्या रांगा लागतात.आयटी उद्यानात मेट्रोच्या कामामुळे मुख्य रस्ता अरुंद झाल्याने बहुतांश ट्रॅफीक माण मार्गे हिंजवडी, पुण्याकडे किंवा पिरंगुट घोटावडेकडे जाते. पर्यायाने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर रहदारी वाढल्याने हा रस्ता आयटीतील प्रवाशांसह स्थानिकांची मोठी डोखेदुखी ठरत आहे.
फेज तीनकडे जाणाऱ्या रस्त्यावर माण देवी चौकात सकाळी आठ ते दुपारी बारापर्यंत आणि सायंकाळी पाचच्या सुमारास तीन-तीन तास वाहतूक कोंडी होते. त्यातच रस्त्याला दुभाजक व साइडपट्ट्या नसल्याने एखादे अवजड वाहन बंद पडले तर तासन्तास चक्का जाम होतो.माणदेवी चौक ते राक्षे वस्ती, बोडकेवाडी फाट्यापर्यंत तर पश्चिमेकडे बापूजीबुवा गवारेवाडीपर्यंत लागलेल्या वाहनांच्या रांगांमुळे सर्वजण हैराण झाले होते.
माणमध्ये मुख्य ठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचारी नेमूनही वाहतूक कोंडी होते. याबाबत ग्रामपंचायतीकडून पत्रव्यवहार देखील करण्यात आला आहे. मेट्रोचे काम लवकरात लवकर पूर्ण झाल्यास या रस्त्यावरील ताण कमी होईल.
– अर्चना आढाव, सरपंच, माण.
आयटी उद्यानात एक कर्मचारी एक वाहन अशी स्थिती आहे. त्यामुळे रोजच सर्व रस्त्यांवर ट्रॅफीक जाम होते. यासाठी कंपन्यांनी पूर्वीप्रमाणे कॅब व बस सर्विस सुरू करावी किंवा एक माणूस एक कार ही संकल्पना बंद करावी तेव्हाच आयटी परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल.
– अनिल पारखी, स्थानिक नागरिक.