नवी दिल्ली – राष्ट्रीय राजकारणात प्रभाव निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चालू महिन्याच्या अखेरीस मुंबईचा दौरा करणार आहेत. त्यावेळी त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
ममतांच्या तृणमूल कॉंग्रेसने इतर राज्यांतही विस्तारण्याचा संकल्प केला आहे. त्यातून त्या पक्षात इतर राज्यांतील नेत्यांना प्रवेश दिला जात आहे. अशात दिल्ली दौऱ्यावर असणाऱ्या ममता कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार का याविषयी तर्क-वितर्क सुरू झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी भेट घेतल्यानंतर ममतांना पत्रकारांनी गाठले.
नेहमीप्रमाणे यावेळीही सोनियांना भेटणार का, या पत्रकारांच्या प्रश्नावर त्या उत्तरल्या, यावेळी मी केवळ मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती. आगामी निवडणुकांच्या तयारीत सर्व नेते व्यस्त आहेत. प्रत्येक वेळी सोनियांची भेट का घेऊ? ती काही घटनात्मक जबाबदारी नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
दरम्यान, मोदींच्या भेटीत सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) कार्यक्षेत्रात वाढ करण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी केल्याची माहिती ममतांनी दिली. बीएसएफचे कार्यक्षेत्र वाढवल्याने कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून ते दल आणि पोलिसांमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण होऊ शकते. संघराज्यीय रचनेला धक्का पोहचवणे योग्य नाही, असे त्या म्हणाल्या.
केंद्र सरकारकडून बंगालला अद्याप 96 हजार कोटी रूपयांची थकबाकी मिळायची आहे. ती देण्याची मागणी मी मोदींकडे केली. केंद्राकडून हक्काचा निधी उपलब्ध झाला नाही तर राज्य कसे चालवायचे, असा सवालही त्यांनी केला.