Mamata Banerjee – लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. त्यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे एक सस्पेन्स निर्माण झाला आहे. ४२ खासदार निवडून देणाऱ्या या राज्यात त्यामुळे इंडिया आघाडी दुबळी होणार असून भाजपच्या विरोधात एकास एक लढत देण्याची रणनीती आता बहुतेक संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
मात्र ममतांच्या निर्णयाच्या पाश्र्वभूमीवर आता यामागच्या कारणांचीही चर्चा सुरू झाली असून साधारणपणे तीन गोष्टींमुळे ममता यांनी एकला चालो रे… चा निर्णय घेतला असल्याचे मानले जाते आहे. इंडिया आघाडीच्या संदर्भात आपण कॉंग्रेस हाय कमांडला काही प्रस्ताव दिले होते. मात्र त्यांनी आपले सर्व प्रस्ताव फेटाळल्यामुळे आपण स्वबळावर लढण्याचे ठरवले असल्याचे ममतांनी कालच जाहीर केले आहे.
बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या तीन प्रमुख पक्षांसह गोरखा जनमुक्ती मोर्चा (तमांग गट), ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक आणि आरपीआय यांच्यासह अन्य लहान पक्षांचाही इंडिया आघाडीत समावेश आहे. २०१९ च्या मतांच्या टक्केवारीचा अभ्यास केला तर ६० टक्के मतांवर या पक्षांचा कब्जा आहे. बहुतांश लहान पक्षांचा उत्तर बंगाल भागात विशेष प्रभाव आहे. ममतांच्या वेगळे होण्यामुळे आता राज्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
गेल्या निवडणुकीत ममतांना २२, भाजपला १८ जर कॉंग्रेसला २ जागा मिळाल्या होत्या. अनेक जागांवर कॉंग्रेस आणि माकपचा ममतांना फटका बसला होता. किमान १० जागांवर या दोन पक्षांमुळे ममतांच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. असे असले तरी पुढील तीन कारणांमुळे इंडियासोबत जाण्याची ममतांची तयारी नाही.
१. ममता बॅनर्जी यांना डाव्या पक्षांसोबत जायचेच नसल्याचे त्यांनी कॉंग्रेस श्रेष्ठींना दोन वेळा सांगितले होते. ममतांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी स्वत: राहुल गांधी यांची भेट घेत डाव्यांना आघाडीतून बाहेर करा अशी स्पष्ट मागणी त्यांच्याकडे केली होती.
ममता यांनीही सोनिया गांधी यांच्या भेटीत त्यांना हेच सांगितले होते. मात्र कॉंग्रेसची यासाठी तयारी नव्हती. बंगालमध्ये डाव्यांसाठी जागा सोडायच्या आणि केरळमध्ये स्वत: मात्र डाव्यांच्या विरोधात मैत्रीपूर्ण लढत द्यायची अशी कॉंग्रेसची रणनीती होती, ती ममतांना मान्य नव्हती.
२. कॉंग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी ज्याप्रकारे ममता आणि तृणमूलवर टीका करत आहेत त्यावर ममता सगळ्यांत जास्त नाराज होत्या. आघाडीची घोषणा झाल्यानंतरही चौधरी यांनी ममतांना लक्ष्य करणे थांबवले नव्हते त्यामुळे ममता भडकल्या होत्या. आघाडीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत त्यांनी याबाबत निषेधही नोंदवला होता.
मात्र त्यांना अपेक्षित असलेली कारवाई झाली नाही. चौधरी यांना हटवण्याची ममतांची मागणी कॉंग्रेसने फेटाळली होती. त्याला कारण कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा चौधरी यांनाच पूर्ण पाठिंबा होता. अशा स्थितीत ममतांच्या समाधानासाठी कॉंग्रेसला आपले स्वत:चे नुकसान करून घेणे परवडणारे नव्हते.
३. केंद्रीय तपास संस्थांच्या भीतीमुळेही ममतांनी एकटे जाण्याचा निर्णय घेतला असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. एकटे लढल्यामुळे भाजपला लाभ होईल याची कल्पना असूनही त्याच कारणास्तव त्यांनी असा निर्णय घेतला असू शकतो असे सूत्रांचे म्हणणे आहे. ममतांचा भाजपशी गुप्त समझोता आहे याची आम्हाला कल्पना होतीच असे कॉंग्रेसच्या दीपा दासमुन्शी यांनी म्हटले आहे.
इतका काळ त्या आघाडीत राहील्या आणि आता अचानक त्यांनी भूमिका बदलल्यामुळे आमचा अनुमान खरा ठरल्यचे दासमुन्शी यांनी नमूद केले. माकपचे प्रदेशाध्यश मोहम्मद सलिम यांनीही या दाव्याचे समर्थन केले आहे. आता आम्ही अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधात कारवाई करणार नाही असे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच ममतांना आश्वस्त केले असल्यामुळे त्यांनी घुमजाव केल्याचे सलिम यांनी म्हटले आहे.