जळोची(प्रतिनिधी) – पावसामुळे भाजी मंडईत चिखल व राडारोड झाला.याबाबत सोशल मिडीयावर प्रतिक्रिया उमटल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत मंडई दुरुस्तीचे काम हाती घेतले.
माळेगाव येथील भाजी मंडई पोलिस स्टेशन लगत पाटबंधारे विभागाच्या जागेत भरते. याठिकाणी सुमारे दिडशे भाजी विक्रेते भाजी विकतात. मात्र दोन दिवस पडलेल्या पावसामुळे मंडईत चिखल व राडारोड झाला आहे. अनेकांची भाजी पाण्यात तरंगत होते. शिवाय चिखल झाल्याने ग्राहक देखील भाजी खरेदीला येत नसल्याने भाजी विक्रेत्यांना तोटा सहन करावा लागत होता.
“माळेगाव ग्रामपंचायतीच्या पाठीमागे भाजी मंडईसाठी 22 लाखांचे काम केले आहे.याठिकाणी सुविधा असल्याने भाजी मंडई भरवली जावी.
-कुरबान बागवान, भाजी विक्रेते.
कर देत असताना या असुविधेबाबत सोशल मिडीयावर अनेक विक्रेत्यांनी कारभारा बाबत नाराजी व्यक्त करत प्रशासनावर टिका केली. सोशल मिडीयावर झालेल्या टिकेनंतर प्रशासन जागे झाले. सरपंच जयदीप तावरे, उपसरपंच अजित तांबोळी व ग्रामविकास अधिकारी संजय साळुंखे यांनी मंडई दुरुस्तीचा निर्णय घेतला.
यावेळी संपूर्ण मंडईत मुरुम टाकण्यात आला. विक्रेते व ग्राहकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच शौचालय देखील दुरुस्त केले आहे. प्रशासनाने दखल घेतल्याने विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे.