महापौर माई ढोरे यांची मुख्यमंत्र्यांना विनंती
पिंपरी – करोनाच्या संक्रमण काळात तोंडाला मास्क लावणे अत्यावश्यक आहे. मात्र तरूण मुले तोंडाला मास्क न लावता फिरत असल्याचे दिसून येत आहे. अशांना दंड केला जातो. मात्र, त्या दंडासही नागरिक घाबरत नसून, कायदे अधिक कडक करून, दंडासह शिक्षेची तरतूद करावी. त्या भीतीने नागरिक मास्क वापरू लागतील. त्यामुळे करोनाचा संसर्ग रोखण्यास मदत मिळेल, अशी विनंती महापौर माई ढोरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.
करोना संसर्गाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत महापौरांनी पिंपरी-चिंचवड शहराबाबत प्रमुख मुद्दे उपस्थित केले. त्यावेळी त्यांनी वरील विनंती केली.
महापौर ढोरे म्हणाल्या की, मास्क न लावणाऱ्यांना 500 रूपये दंड केला जातो. तरीही तरूण मुले मास्क न लावता. केवळ मानेवर अडकवून फिरत असल्याचे सर्वत्र दिसून येत आहेत. योग्य प्रकारे मास्क न लावल्याने करोनाचा संसर्ग वाढला आहे. ते रोखण्यासाठी दंडासह कठोर शिक्षा केली जावी. संसर्ग होऊन नये म्हणून महापालिकेने तातडीने पावले उचलत मार्च व एप्रिल महिन्यात तब्बल 15 लाख मास्कचे वितरण झोपडपट्टी परिसरात केले.
तसेच, देहू गावासाठी 2 लाख मास्क दिले. त्याचा चांगला परिणाम दिसून आला. शहरात व्हेंटिलेटरअभावी सुरुवातीच्या टप्प्यात 2 ते 3 रूग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर महापालिका प्रशासनाने तातडीने व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करून दिली. करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी जम्बो रूग्णालय उभारले जाणार आहेत. मात्र, त्यापेक्षा इमारती, मंगल कार्यालय, हॉटेल, सभागृह अशा इमारतींमध्ये रूग्णालय उभारण्यास कमी कालावधी लागेल. त्यामुळे शक्यतो अशा ठिकाणी रुग्णालये उभारावी असेही त्यांनी सांगितले.