अकोले (प्रतिनिधी) – शेती मालाला हमी भाव नाही. रोजगार हमीची कामे बंद आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडता दुधाला 35 रुपये भाव तातडीने द्यावा, अशी मागणी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केली.
दुधाला हमीभाव मिळावा, लिटर मागे 10 रुपये अनुदान मिळावे, दूध भुकटीला किलो मागे 50 रुपये अनुदान मिळावे, या मागणीसाठी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपच्या वतीने माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली अकोले शहरातील सिद्धेश्वर दूध डेअरीसमोर महाएल्गार आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, शेतकरी नेते मधुकरराव नवले, भाजप तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, बाळासाहेब ताजने, सिद्धेश्वरचे अध्यक्ष संदीप शेटे, नगराध्यक्षा संगीता शेटे आदी उपस्थित होते.
दूध व्यवसाय वाचला तरच शेतकरी वाचणार आहे. मात्र दुधाचे भाव घसरले आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. राज्य सरकार दूधउत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधात षड्यंत्र रचत असल्याचा आरोप राज्याचे शेतकरी नेते मधुकर नवले यांनी केला. गणोरे येथे माजी आमदार वैभवराव पिचड, जि. प. गटनेते जालिंदर वाकचौरे, खडकी येथे सभापती उर्मिला राऊत, वीरगाव येथे अमृतसागर दूध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, मनोहरपूर व लिंगदेव येथे भाजपा तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, विठ्ठल कानवडे, आंबड येथे गिरजाजी जाधव, कळस येथे भाजप सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, आर.पी.आय जिल्हाउपाध्यक्ष राजेंद्र गवांदे, आंभोळ येथे अमृतसागर दूध संघाचे संचालक शरद चौधरी, जनलक्ष्मी दूध डेअरी समोर भाऊ पाटील नवले, तसेच विविध गावांत भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.