नवी दिल्ली : भाजपचे मंत्री काही दिवसांपासून सतत वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहेत. त्यातच आता भाजपच्या आणखी एका नेत्याने असेच एक वादग्रस्त केले आहे. ‘इतिहास बनू नका, तर इतिहास घडवा म्हणजे इथे तैमूर, औरंगजेब, बाबर, हुमायून जन्माला येणार नाहीत’, असे वादग्रस्त विधान भाजपाचे हरयाणाचे प्रवक्ते आणि करणी सेनेचे अध्यक्ष सूरज पाल अमू यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
गुरगावमध्ये रविवारी महापंचायत पार पडली. या पंचायतीत लव्ह जिहाद, धर्मांतर आणि लोकसंख्या नियंत्रण कायद्यावर चर्चा झाली. यावेळी त्यांनी पाकिस्तानी नागरिकांना भाड्याने घरे देऊ नका, तर त्यांना भारतातून हाकलण्याचा प्रस्ताव मंजूर करावा, असे वक्तव्यही केले .
“१९४७ मध्ये देशाची फाळणी झाली. आपण १० लाख लोकांचे मृतदेह बघितले. त्या मृतदेहांची आतापर्यंत कुठेच माहिती नाही आणि आपण त्यांना घरं भाड्यानं देतोय. इतकंच नाही, तर पतौडीमध्ये त्यांचे पार्क उभारले जात आहेत. उभारण्यात येणाऱ्या पार्कचे दगड उखडून फेका… हे दगड काढून फेकण्यासाठी कोणते युवक तयार आहेत?,” असे सूरज पाल अमू म्हणाले.
“मला उज्जिना येथील सूरज पाल सिंह यांची आठवण येत आहे, ज्यांनी आपल्या गावात मशीद उभारू दिली नाही. एक तरुण मला सांगत होता की, भोडकलानमध्ये पुन्हा पुन्हा मशीद उभारण्यात येत आहे. ते हे थांबवतात. पण पुन्हा मशीद उभारली जाते. हे मूळापासूनच उखडून फेका,” असे भडकाऊ विधान सूरज पाल अमू यांनी महापंचायतीत बोलताना केले.
“जर देशात इतिहास घडवायची इच्छा असेल, तर इतिहास बनायचं नाहीये; इतिहास बनवायचा आहे. मग ना तैमूर जन्माला येईल, ना औरंगजेब, बाबर, हुमायून जन्माला येईल. आपण शंभर कोटी आहोत आणि ते २० कोटी,” असे वक्तव्यही सूरज पाल अमू यांनी या पंचायतीत केले.
करणी सेनेचे अध्यक्ष असलेले सूरज पाल अमू २०१७ मध्ये पद्मावत सिनेमावरून निर्माण झालेल्या वादामुळे चर्चेत आले होते. सूरज पाल अमू यांनी चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेली अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा शिरच्छेद करणाऱ्याला दहा १० कोटी रुपयांचे बक्षिस देण्याची घोषणा केली होती. त्यावरून ते वादातही सापडले होते.