नवी दिल्ली: गेल्या वर्षभरापासून कोरोना संकटामुळे रेल्वेची देशभरातील प्रवासी वाहतूक जवळपास ठप्प असल्यात जमा आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेला प्रवासी वाहतुकीसाठी मिळणारे मोठे उत्पन्न बुडत आहे. मात्र, याचा काळात रेल्वेने भंगारात काढलेल्या वस्तुंची विक्री करुन मोठे उत्पन्न मिळवले आहे.
माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, 2020-21 या वर्षात भारतीय रेल्वेने भंगार विक्रीतून 4575 कोटी रुपये कमावले आहेत. ही भंगार विक्रीतून झालेली आतापर्यंतची सर्वात मोठी कमाई आहे. यापूर्वी 2010-11 साली रेल्वेने भंगार विकून 4,409 कोटी रुपये मिळवले होते.
रेल्वेकडून भंगारात काढण्यात आलेल्या वस्तूंमध्ये जुने रुळ, साचे, जुनी इंजिनं, त्यांच डब्बे अशा गोष्टींचा समावेश आहे. सध्या अनेक मार्गांवर रेल्वेकडून विद्युतीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे जुन्या इंजिनांमध्ये बदल करावे लागतात. या प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणावर भंगार निघते. भंगार विक्रीचा व्यवहार पारदर्शक ठेवण्यासाठी ही लिलाव प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडली. रेल्वे खात्याने 2021-22 या आर्थिक वर्षात भंगार विक्रीतून 4100 कोटी रुपये इतके उत्पन्न मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
यापूर्वी भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या माध्यमातून रेकॉर्ड ब्रेक उत्पन्नाची कमाई केली होती. यंदाच्या मे महिन्यात भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या माध्यमातून विक्रमी उत्पन्न मिळवले आहे. मे महिन्यात रेल्वेने 114.8 मिलियन टन मालाची वाहतूक केली. या माध्यमातून रेल्वेला 11604.94 कोटी रुपये मिळाले.
मालवाहतुकीमध्ये प्रामुख्याने कोळसा, लोह, खाद्यपदार्थ, खनिज तेल आणि सिमेंटचा समावेश आहे. गेल्या काही काळापासून भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न वाढवण्यावर विशेष लक्ष दिले आहे. मालगाड्यांचा वेगही वाढवण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.