मुंबई – आयपीएल स्पर्धेतील एका सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा खेळाडू विजय शंकर धाव घेत असताना क्षेत्ररक्षकाने फेकलेला चेंडू त्याला लागला होता. या घटना क्रिकेटमध्ये यापुढेही घडू शकतात, त्यामुळे आयसीसी व सर्व देशांच्या क्रिकेट मंडळांनी सर्व फलंदाजांना हेल्मेट वापरण्याची सक्ती करावी, अशी आग्रही मागणी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केली आहे.
किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात हैदराबादचा विजय शंकर थोडक्यात बचावला. या सामन्यात विजय शंकर धाव घेत असताना निकोलस पूरनने यष्टींच्या दिशेने फेकलेला चेंडू विजयच्या हेल्मेटला लागला.
तेव्हा असे वाटले की विजयला दुखापत झाली, अर्थात तसे काही झाले नाही; पण अशा घटना नेहमीच घडू शकतात व खेळाडू जखमीही होऊ शकतात, त्यामुळे पुढील काळात सर्व फलंदाजांना हेल्मेट वापरणे सक्तीचे केले जावे, तरच अशा घटनांमध्ये खेळाडू जायबंदी होणार नाहीत, असे मतही सचिनने मांडले.