दुबई – दिल्ली कॅपिटल्सशी जोडले गेलेल्या ऑस्ट्रेलियाच्या टॉम मुडी यांनी यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याच्यावर सडकून टीका केली आहे. आयपीएल स्पर्धेत खेळण्याची पंतची पात्रताच नव्हती, अशा शब्दांत मुडी यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
यंदाच्या स्पर्धेत पंतने प्रत्येक सामन्यात बेजबाबदार खेळ केला. त्याची तंदुरुस्तीही पूर्ण नव्हती. त्याने स्वतःच्या खेळाकडे तसेच तंदुरुस्तीकडे गांभिर्याने पाहिलेच नाही. काही सामन्यात संघाला विजय मिळू शकला असता मात्र, त्यावेळी खेळपट्टीवर स्तिरावलेला असूनही त्याने अत्यंत आनावश्यक फटके मारुन आपली विकेट गमावली. यामुळे केवळ त्याचेच नाही तर संघाचेही नुकसान झाले. अर्थात हे सर्व कळण्याचीही त्याची पात्रता नाही, अशा शब्दात मुडी यांनी पंतला फटकारले आहे.
संघ सातत्याने सामने जिंकत होता. ही वाटचाल खरोखर स्वप्नवत होती. मात्र, आशा वेळी प्रत्येक सामना अत्यंत गांभिर्याने घेतला गेला पाहीजे. तसे झाले नाही तर विजयी सातत्य राखणे कठीण ठरते व तेच दिल्ली संघाबाबत झाले. केवळ पंतलाच दोष देता येणार नाही पण पराभवाची जी काही कारणे आहेत, त्यातील एक प्रमुख कारण त्याची बेजबाबदार वृत्ती हे आहे. त्याला दुखापतीमुळेही काही सामन्यांतून बाहेर बसावे लागले याचा विचार आता त्यानेच केला पाहिजे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीकडून तंदुरुस्ती कशी टीकवायची असते हे त्याने शिकावे, असा सल्लाही मुडी यांनी दिला.
जगभरात करोनामुळे लॉकडाऊन लावले गेले होते. या काळात मानसिकता खंबिर ठेवणे जड जात होते. मात्र, या काळात कोहलीसारखे खेळाडू आपल्या तंदुरुस्तीबाबत दक्ष होते,त्यामुळेच मैदानावर खेळताना कोहलीने त्यासाठी कीती जागरुकपणे मेहनत घेतली ते स्पष्ट दिसून येते. पंतकडे पाहिल्यावर त्याने ही काळजी घेतली नाही हे देखील समजते. येत्या काळात त्याने आपला दृष्टिकोन बदलला नाही तर त्याची कारकीर्दही धोक्यात येइल, असा इशाराही त्यांनी दिला.