कोलकाता – संसदेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर होतो आहे. या आरोपांमुळे मोईत्रा यांच्या अडचणी अर्थातच वाढल्या आहेत. मात्र गेल्या चार दिवसांपासून हे प्रकरण चर्चेचा विषय ठरले असताना अजुनही प. बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. विशेष म्हणजे मोईत्रा यांच्या बचावासाठी त्यांच्या पक्षातील कोणी नेताही अद्याप पुढे आलेला नाही.
उद्योजक दर्शन हिरानंदानी यांच्याकडून लाच घेत मोईत्रा यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्या संदर्भातील प्रश्न संसदेत विचारले होते असा आरोप आहे. भारतीय जनता पार्टीच्या खासदाराने लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना याबाबत पत्र पाठवले होते व त्यांनी आता चौकशीसाठी हे प्रकरण आचरण समितीकडे सोपवले आहे.
मोईत्रा यांच्यावरिल आरोप सिध्द झाले तर त्यांना खासदारकी सोडावी लागू शकते. एवढा सगळा प्रकार घडत असताना तृणमूलचे सगळेच नेते गप्प आहेत ही बाब चकित करणारी आहे. दिल्लीतील एका माध्यमाने याबाबत तृणमूलच्या दोन नेत्यांकडे विचारणा केली असता मोईत्रा प्रकरणात गप्प राहण्याच्या सूचना आम्हाला करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. मोईत्रा यांनी स्वत: आपली बाजू मांडली आहे. तरीही पक्षाकडून त्यांच्याविषयी अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही.
दरम्यान, प्रश्न विचारण्याच्या मोबदल्यात मोईत्रा यांनी पैसे घेतले होते अशी थेट कबुली स्वत: दर्शन हिरानंदानी यांनी दिली आहे. तर त्यांनी केंद्राकडून आलेल्या दबावामुळे ही कबुली दिली असल्याचा दावा मोईत्रा यांनी केला आहे.
या सगळ्या घटनाक्रमात ममता बॅनर्जी यांचे गप्प राहणे चर्चेचा विषय ठरले असून ममता आणि मोईत्रा यांच्यातील बिघडलेल्या संबंधांचे हे निदर्शक असल्याचे मानले जाते आहे. मोईत्रा यांचे वादग्रस्त विधानांशी कायमच नाते राहीले आहे. यापूर्वीही त्यांनी काली मातेबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे चांगलाच गदारोळ निर्माण झाला होता. भारतीय जनता पार्टीने तेंव्हाही मोईत्रा यांच्या विरोधात निदर्शने केली होती. त्यावेळीही तृणमूलने ती मोईत्रा यांची व्यक्तीगत भूमिका असल्याचा पवित्रा घेत हात झटकले होते. संबंध इतके चिघळले होते की मोईत्रा यांनी सोशल मीडियावर आपल्या पक्षालाच अनफॉलो केले होते.
अलिकडचे एका जाहीर सभेत व्यासपीठावरूनच ममता यांनी मोईत्रा यांना कानपिचक्या दिल्या होत्या. मोईत्रा यांनी केवळ आपल्या मतदारसंघाकडे लक्ष द्यावे अशा सूचना ममता यांनी त्यांना केल्या होत्या. मोईत्रा तृणमूलच्या अन्य खासदारांच्या मतदार संघांमध्ये हस्तक्षेप करत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ममता यांनी त्या व्यासपीठावर बसल्या असतानाच ही ताकीद दिली होती.
हिरानंदानी यांची कबुली आणि आचरण समितीची चौकशी आणि पक्षाने झटकलेले हात या तीन बाबी मोईत्रा यांना तापदायक ठरणार असून आताची खासदारकी तर जाईलच, मात्र पुन्हा तृणमूलकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यताही धूसर झाली आहे.