मुंबई : राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आता 64 वर पोहोचली आहे. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत राज्यात 12 नव्या बाधितांची भर पडल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील 11 जणांना शनिवारी बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. तसेच पुण्यात आणखी एकाला बाधा झाली.
दरम्यान पुण्यातील रस्त्यांवरील गर्दी बऱ्यापैकी ओसरली असली तरी मुंबईत अजूनही लोकल आणि बस गाड्यांमध्ये गर्दी असल्याचे पहायला मिळत आहे. पुण्यात भरदुपारी लक्ष्मी, बाजीराव, शिवाजी, फर्गसन, जंगली महाराज आणि टिळक या महत्वांच्या रस्त्यांवर संचारबंदी सदृश स्थिती होती.
दूध, अन्न धान्य आणि औषधांची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने स्वयंस्फूर्तीन बंद होती. अनेक कार्यालयांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे पुण्यात सुरवातीला ज्या वेगाने बाधीत आढळले त्या प्रमाणात काहीशी घट झाल्याचे चित्र आहे. मात्र येथील एका रुग्णालयात परदेश प्रवास अथवा कोरोनाबाधितांशी थेट संपर्क आला असल्याचे माहित नसणाऱ्या एका महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे शहरात भीती व्यक्त होत आहे.