अजित पवार : उपमुख्यमंत्र्यांनी दिली प्रथमच विजयस्तंभास मानवंदना
शिक्रापूर – छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास व विजय रणस्तंभाच्या शौर्याच्या इतिहासातून तरुणांनी प्रेरणा घेऊन सामाजिक सलोखा जपण्यासाठी अफवांवर विश्वास ठेवू नका. महाराष्ट्राला पुन्हा एकदा देशात अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी जनतेनी साथ द्यावी, असे आवाहन नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे दि. 1 जानेवारी रोजी ऐतिहासिक विजय रणस्तंभास उपमुख्यमंत्री पवार यांनी सकाळी मानवंदना दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार अशोक पवार, माजी पंचायत समिती सदस्य पी. के. गव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
पवार म्हणाले की, सामाजिक सलोखा जपण्याची परंपरा कायम ठेवत जातीय सलोखा जपण्यास सांगत परिसराला संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास व विजय रणस्तंभाच्या शौर्यातूनही प्रेरणा घ्यावी. पूर्वी महाराष्ट्र हे देशात अव्वल क्रमांकाचे राज्य होते. ती ओळख पुन्हा निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सर्व मंत्री प्रथम क्रमांकाचे राज्य बनवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
कायदा, सुव्यवस्था राखत महिलांना संरक्षण देत त्यांच्यावर अन्याय न होण्यासाठी पोलिसांचा समाजात आदरयुक्त दबदबा ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. यावेळी कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाच्या वतीने पवार यांना विजय रणस्तंभाची प्रतिकृती भेट देत त्यांचा सन्मान करण्यात आला.