मुंबई – भारतीय रेल्वे ही प्रवाशांच्या सुविधेसह देशातील कृषी आणि औद्योगिक क्षेत्रांच्या प्रगतीची वाहक आहे. रेल्वे यंत्रणेत अत्याधुनिक पायाभूत सुविधांच्या उभारणीसह भारतीय रेल्वेचा कायाकल्प होत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे मध्य व पश्चिम रेल्वेच्या विविध रेल्वे स्थानके व रेल्वे उड्डाणपूल व रेल्वे अंडरपासचे भूमिपूजन व लोकार्पण, उद्घाटन कार्यक्रम झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची ई – उपस्थिती होती.
नरेंद्र मोदी म्हणाले, देशात विविध क्षेत्रातील पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणावर व प्रचंड गतीने होत आहेत. याद्वारेच रोजगारासाठीही मोठी चालना मिळत आहे. रेल्वे यंत्रणाही वेगाने बदलत आहे. रेल्वेचा कायापालट होत आहे. रेल्वेस्थानके अत्याधुनिक सुविधांनी युक्त करण्यासाठी अमृत भारत रेल्वेस्टेशन योजनेचा आरंभ करण्यात आला.
भारतीय रेल्वे देशवासीयांसाठी ‘ईज ऑल ट्रव्हल’ झाले आहे. भारतीय रेल्वे विभागाच्या अत्याधुनिकीकरणासाठी भरीव निधी उपलब्ध करुन दिला जात आहे. ‘वन नेशन वन प्रॉडक्ट’ ही योजनाही रोजगार निर्मितीला चालना देणारी ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे म्हणाले, महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून मोठी मदत होत आहे. सध्या राज्यात २२७४ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे अमृत भारत स्टेशन, रोड ओव्हर ब्रीज आरओबी आणि आरयूबी असे २४१ रेल्वे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. यावर्षीच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी १५ हजार ५५४ कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ५६ स्थानके जागतिक दर्जाची रेल्वे स्थानके म्हणून विकसित करण्यात येणार आहेत.
मागील दहा वर्षात रेल्वेच्या विविध यंत्रणात अभूतपूर्व बदल झाले असून रेल्वेसाठीच्या अत्याधुनिक पायाभूत सुविधांची उभारणी व प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देतानाच भारतीय रेल्वे पर्यावरणपूरक होत आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.