मुंबई – मान्सूनला केरळमध्ये दाखल होण्यास आणखी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागणार आहे, त्यामुळे महाराष्ट्रातही याचा परिणाम होऊन महाराष्ट्रात 15 जूनला मान्सून दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
राज्यात उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळेच नागरिकांकडून एखाद्या चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहण्यात येत आहे. साधारणतः रविवारी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. कारण जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होत असतो. पण रविवारी मान्सूनने केरळला मोठी हुलकावणी दिल्याने आता महाराष्ट्रातही मान्सून उशीराच दाखल होणार आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनला केरळमध्ये दाखल होण्यास आणखी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही याचा परिणाम होऊन 15 जूनला मान्सून दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यात काही दिवसांपासून मान्सूनपूर्व सरी बरसत आहेत. त्यामुळे नागरिकांची थोड्याफार प्रमाणात का असेना पण गरमीपासून सुटका झाली आहे. पण मुंबईकर मात्र या उष्णतेमुळे हैराण झालेले पाहायला मिळत आहे. यामुळे मुंबईच्या अनेक भागात दुपारच्यावेळी शुकशुकाट पाहायला मिळतो.
महत्त्वाची बाब म्हणजे, मान्सून जरी लांबणीवर गेला असला तरी खरीप पेरणीवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.