भुईंज (प्रतिनिधी) – पुणे बंगळुरू महामार्गावरील आनेवाडी येथे अपघातात दोन महिलांचा जागीच म्रुत्यू झाला. तर लहान मुलगी गंभीर जखमी झाली असून अधिक उपचारासाठी बालिकेला पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते.
याबाबत भुईंज पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, महामार्गावर आनेवाडी येथे महामार्ग व सेवा रस्ता येथे वाहनाची वाट बघत उभ्या असलेल्या शारदा कैलास शिर्के (वय ६५, रा. पारवडी) व तेजस्विनी राजेद्र कांबळे (वय ३५, रा. पांडे)
व मुलगी श्रावणी राजेद्र कांबळे (वय ९, रा. पांडे ता. भोर जि. पुणे) यांना आनेवाडी टोल नाका पास करुन बेळगावकडे केमिकल घेऊन निघालेला टँकरने (सीजे 20 व्ही 7473) या तिघींना जोरदार धडक दिली. यात दोन्हीही महिलांचा मृत्यू झाला.
श्रावणी गंभीररित्या जखमी झाली आहे. तिला सातारहून अधिक उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच भुईंज पोलिस ठाण्याचे सपोनि रमेश गर्जे व विजय अवघडे, सुशांत धुमाळ व पांडुरंग पवार अपघातस्थळी दाखल झाले.
अपघातस्थळी वाईचे नवनियुक्त पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब भालचिम यांनी भेट देऊन मुलीची विचारपूस करीत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. या अपघाताची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात झाली आहे. सपोनि रमेश गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे तपास करीत आहेत.
काळ पण आला आणि वेळ पण आली !!!
या महिलांना लिंब (ता. सातारा) येथील परिसरात जायचे होते. त्या भोरकडून बसने आल्या. मध्ये बस बदलून दुसरी बस पकडुन सातारा तिकीट काढले. मात्र, लिंब फाट्यावर उतरण्याऐवजी त्या आनेवाडीत उतरल्या आणि तिथेच वेळेने आणि काळाने त्यांच्यावर घाला घातला. अपघातस्थळी छिन्नविछिन्न अवस्थेत पडलेल्या महिलांना मदत करताना सुध्दा मदत करणारांचे हात तर कापतच होते आणि डोळ्यातुन अश्रूही वाहत होते.