मुंबई :- गुरुवारी राज्यातील काही भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळपासूनच पाऊस पडत असल्याने ठीकठिकाणी पाणी साचल्याने आर्थिक राजधानी मुंबापूरीची चिंबापूरी झाल्याचे चित्र गुरुवारी पाहायला मिळाले.
गुरुवार पाठोपाठ हवामान विभागाने शुक्रवारीही कोकण, घाटमाथा, विदर्भात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईसह रत्नागिरी, पुणे, सातारा जिल्ह्यांचा घाटमाथा, तसेच विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूरमध्ये अति जोरदार पावसाचा “रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
गुरुवारी झालेल्या पावसाने पावसाने काही जिल्ह्यातील बळीराजा सुखावला. तर, काही ठिकाणी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.
लांजा तालुक्यातील काजळी नदीला पूर आल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातही पावसाने चांगली हजेरी लावली असून भिवंडी, अंबरनाथमध्ये काही ठिकाणी पाणी साचले. ज्याचा वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
रेड अलर्ट :- मुंबई, रत्नागिरी, पुणे, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली.
ऑरेंज अलर्ट :- पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, यवतमाळ, नागपूर, गोंदिया, भंडारा.
येलो अलर्ट :- नंदूरबार, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा.
नागपूर- परभणीत संततधार..
नागपूरसह- परभणी जिल्ह्यात गुरुवारी सकाळपासून सर्वत्र संततधार पाऊस सुरू होती. सायंकाळी मात्र या पावसाचा जोर वाढला असून या भागांमध्ये दमदार पाऊस होत आहे. यामुळे पीक बहरली आहेत. तसेच जोरदार पावसामुळे नागपूरचा अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. तसेच शहरातील अनेक रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे. दरम्यान, हिंगणा भागातील वेणा नदीला पूर आला आहे. यामध्ये काही नागरिक अडकले होते, त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.
नगर जिल्ह्यातील शेतकरी सुखावला..
अहमदनगर शहरसह जिल्ह्यात गुरुवारी दमदार पावसाने हजेरी लावली. जुलै महिना लोटला तरीही जिल्ह्यातील दक्षिण भागातील तालुक्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा होती. अहमदनगर शहरासह कर्जत-जामखेडचा काही भाग, पाथर्डी, श्रीगोंदा, पारनेर, शेवगाव तालुक्यात दुपारपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. शेवगाव, पाथर्डी तालुक्यात दमदार पाऊस न झाल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. आता जोरदार पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.
शाळांना सुट्टी…
मुंबई महानगरात रेड अलर्ट असल्याने महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी महानगरपालिकेच्या तसेच सर्व शासकीय, खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना गुरुवारी सुटी जाहीर केली होती. मुंबई शहरासह रायगड जिल्ह्यातही शाळांना सुटी देण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी विनय गौडा यांनीही गुरुवारी शाळा- महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली होती.
कोल्हापुरात महापुराची शक्यता..
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे 5 स्वयंचलित दरवाजे बुधवारी उघडल्याने पंचगंगा नदीची पाणीपातळी 5 फुटांनी वाढून 45 फुटांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राधानगरीसह कोल्हापूर शहर, ग्रामीण भाग, करवीर या भागांना अलर्ट करण्यात आले आहे. 45 फुटांपर्यंत पाणी आल्यानंतर ज्या ठिकाणी पुराचे पाणी येते येथील सर्व नागरिकांचे दुपारपर्यंत स्थलांतर करण्यात येत आहे. येथील यापूर्वीचा इतिहास पाहता शासनाने सतर्क होत, यापूर्वीच पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.