नवी दिल्ली :- अरुणाचल प्रदेशमधील काही खेळाडूंना चीनकडून स्टेपल व्हिसा दिला जाण्याच्या कृतीला भारताने स्पष्ट शब्दात अमान्य केले आहे. चीनच्या या कृतीला योग्य शब्दात प्रत्युत्तर देण्याचा भारताला अधिकार असल्याचे भारताच्यावतीने स्पष्ट केले गेले आहे.
भारताने या प्रकरणावर चीनकडे आपला तीव्र निषेध नोंदवला आहे आणि भारतीय नागरिकांसाठी व्हिसा प्रणालीमध्ये अधिवास किंवा वांशिकतेच्या आधारावर कोणताही भेदभाव केला जाऊ नये, असे स्पष्ट शब्दात सांगण्यात आले आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले.
जागतिक विद्यापिठ क्रीडास्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी चीनच्या चेंगडू येथे वुशू खेळाडूंच्या 12 सदस्यीय संघाची भेट बुधवारी रात्री रद्द करण्यात आली कारण या गटातील अरुणाचल प्रदेशातील तीन खेळाडूंना स्टेपल व्हिसा देण्यात आला होता, असे या प्रकरणाशी परिचित असलेल्या लोकांनी सांगितले.
सरकारने या प्रकरणाची तपासणी केल्यानंतर संघाचा प्रवास स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. अन्य खेळाडूंना सर्वसाधारण व्हिसा देण्यात आला होता. मात्र अरुणाचल प्रदेशमधील खेळाडूंना स्टेपल व्हिसा देण्यात आला होता.
आमच्या लक्षात आले आहे की, चीनमधील आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमच्या काही नागरिकांना स्टेपल्ड व्हिसा जारी करण्यात आला आहे, असे बागची म्हणाले.
यापूर्वीही, अरुणाचल प्रदेशातील भारतीयांना चीनने स्टेपल्ड व्हिसा दिल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यावर भारत सरकारकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा चीनकडून केला जातो आहे. अरुणाचल प्रदेशमधील काही ठिकाणांना चिनी भाषेतील नावे चीनकडून देण्यात आली आहेत. त्यावर एप्रिल महिन्यात भारताकडून जोरदार आक्षेप नोंदवला गेला होता. हे भाग पूर्णपणे भारतीय हद्दीतील असून त्यांना नवीन नावे दिली गेल्यामुळे वास्तव बदलणार नाही, असे भारताच्यावतीने स्पष्ट करण्यात आले होते.
वैध भारतीय पासपोर्ट धारक भारतीय नागरिकांचे वास्तव्य आणि वांशिकतेच्या आधारावर व्हिसा देण्यामध्ये कोणताही भेदभाव करण्यात येऊ नये, असे चीनच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे, असे बागची म्हणाले.