Supriya Sule – महाराष्ट्रातील शेतकरी ( farmers ) प्रचंड अडचणीत सापडले आहे. काही जिल्ह्यात गारांचा पाऊस झाल्याने ओला दुष्काळ पाहायला मिळत आहे, तर काही ठिकाणी यंदा पाऊसच झाला नाही. त्यामुळे कोरडा दुष्काळ पडला आहे.
वातावरण बदलामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. द्राक्ष, कांदा, केळी, गहू, धान, कापूस, सोयाबीनसह पाल्याभाज्यांचे नुकसान झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज असून, जुने कर्ज माफ करून नवीन कर्ज द्यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी केली.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात देशातील गेल्या काही महिन्यांमधील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षण, अतिवृष्टी, दुष्काळ, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांची कर्जमाफी यासारख्या अनेक समस्या महाराष्ट्राला भेडसावत आहेत.
यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी हा राज्यातील ज्वलंत प्रश्न असून हा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत मांडला. लोकसभेत शून्य प्रहरादरम्यान महाराष्ट्रातील दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा उपस्थित केला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्यात कुठे ओला, तर कुठे कोरडा दुष्काळ असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. तसेच दुधाला भाव मिळत नसल्याचेही चित्र आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी संकटात आहे. त्यामुळे केंद्रीय पथकाने तत्काळ महाराष्ट्रात जाऊन पाहणी करावी.
तसेच महाराष्ट्राला केंद्राने मदत करावी. तसेच कष्ट करणाऱ्या महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी. तसेच त्यांना नवीन कर्ज देखील देण्यात यावे, अशी थेट मागणी त्यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे बँकेतून त्यांना कर्ज दिले पाहिजे. सोबतच हवामान बदलाचा देखील त्यांना फटका बसत असून, यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे.
आपल्यावर जेव्हा संकट येते त्यावेळी शेतकरी मदतीला धावून येत असतो. त्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.