मुंबई :– कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांच्याविरुद्ध कठोर पाऊले उचलली असून राज्यात २३० गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती शनिवारी (एप्रिल १८, २०२०) महाराष्ट्र सायबर विभागाने दिली.
टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य समाजमाध्यमांवर वर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये ज्या २३० गुन्ह्यांची नोंद झाली आहे त्यापैकी ८ गुन्हे अदखलपात्र (N.C)आहेत.
त्यामध्ये बीड २७, पुणे ग्रामीण १७, मुंबई १६, कोल्हापूर १६, जळगाव १३, सांगली १०, नाशिक ग्रामीण १०, जालना ९, सातारा ८, नाशिक शहर ८, नांदेड ७, परभणी ७, , ठाणे शहर ६, नागपूर शहर ५, सिंधुदुर्ग ५ ,नवी मुंबई ५,सोलापूर ग्रामीण ५, लातूर ५, बुलढाणा ४, पुणे शहर ४, गोंदिया ४, सोलापूर शहर ३, रायगड २, उस्मानाबाद २, ठाणे ग्रामीण १,धुळे १ यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की व्हिडिओ, आक्षेपार्ह व्हाट्सॲप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १०६ गुन्हे दाखल झाले आहेत, तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी ७५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टिकटॉक (titktok) व्हिडिओ शेअर प्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ३ गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, युट्युब्) गैरवापर केल्या प्रकरणी ४० गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत ४६ आरोपींना अटक केली आहे. यापैकी ३१ आक्षेपार्ह पोस्ट्स काढण्यात यश आले आहे.