मुंबई – यंदाच्या अर्थसंकल्पात ठाकरे सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. कृषी संदर्भात विविध घोषणा केल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार वर्ष 2022-23 वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर केला.
यामध्ये एक महत्त्वाची घोषणा म्हणजे भुविकास बँकांचे 34 हजार 788 कर्जदार शेतकऱ्यांकडे असणारे 964 कोटी 15 लाख रुपयांचे कर्ज माफ करण्याची मोठी घोषणा अजित पवार यांनी केली आहे. तसेच भूविकास बँकांच्या जमिनींचा, इमारतींचा वापर यापुढे शासकीय योजनांसाठी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नियमित कर्ज फेडणाऱ्यांना अनुदान
नियमित पीक कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान देणार असल्याचे जाहीर केलं होतं. नवीन आर्थिक वर्षात नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50 हजाराचं अनुदान देण्यात येईल. त्यामुळे त्याचा 20 लाख शेतकऱ्यांना फायदा होईल. त्यामुळे सरकारवर 10 लाख कोटीचा खर्च येणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
पीक योजनेत दुरुस्ती हवी
गुजरात अन्य काही राज्य पंतप्रधान पीक विमा योजनेतून बाहेर पडली आहे. आम्ही या योजनेत बदल करण्याची केंद्राला विनंती केली आहे. आम्ही पीक योजनेसाठी अन्य पर्यायाचं विचार करणार आहोत. शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने कर्ज देण्याचे सांगितले होते. त्यानुसार वाटप झाले आहे आहे, असंही त्यांनी सांगितलं.